पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मृतावस्थेत असलेल्या आई-वडिलांजवळ ६ दिवसांचे अर्भक ३ दिवस पडून होते. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्याप या दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिस करत आहेत. वाचा सविस्तर बातमी. (UP News)
पोलिसांच्या माहितीनुसार, काशिफ आणि त्याची पत्नी अनम हे मूळचे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील आहेत. त्यांनी ८ जून रोजी मुलाला जन्म दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिफ आणि अनम चार महिन्यांपूर्वी टर्नर रोडवर भाड्याच्या घरात राहायला गेले होते. काशिफ क्रेन ऑपरेटर म्हणून काम करत होता, तर अनम गृहिणी होती. वर्षभरापूर्वी त्यांचे लग्न झाले होते.
मंगळवारी (दि.१३) शेजाऱ्यांना काशिफ आणि अनम यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांत केली. त्यांच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी डेहराडूनमधील त्यांचे घर फोडले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. काशिफ ( वय 25 अनम (वय 22) मृतावस्थेत आढळून आले. तर त्यांच्या मृतदेहांच्या जवळच त्यांचे अर्भक जिवंत होते. त्याला ताबडतोब शासकीय दून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीडीएमसीएच) नेण्यात आले. डॉक्टरांनी तो सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. सहा दिवसांचे अर्भक प्रेतांच्या शेजारी अन्नपाण्याशिवाय कसे जगले याबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अर्भकाच्या प्रकृतीबद्दल बोलताना, जीडीएमसीएचचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. युसूफ रिझवी म्हणाले, "बाळाला डिहायड्रेटेड अवस्थेत आणण्यात आले होते आणि त्याला ताबडतोब द्रवपदार्थ देण्यात आले. तो आता स्थिर आहे. आणि आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली आहे. त्याला कोणतीही दुखापत किंवा जखम नाही. त्याला कोणतीही शारीरिक समस्या नाही आहे." दरम्यान, आई-वडिलांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा