मुंबई/पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईहून पुण्याला जाताना त्याने तब्बल 200 किलोमीटर प्रतितास वेगाने आपली लॅम्बोर्गिनी चालवली, एका ठिकाणी तर त्याच्या या कारने 215 चा वेग पकडला होता. वेगमर्यादा न पाळल्यामुळे त्याला तीनदा चलन फाडून दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याच्या या बेदरकार ड्रायव्हिंगबद्दल टीकेची झोड उठली आहे.(Rohit Sharma)
संबंधित बातम्या :
सध्या सुरू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक 2023 मधील पुण्यातील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सहभागी होण्यासाठी तो त्याच्या लॅम्बोर्गिनी कारने मुंबईहून पुण्याला जात होता. यावेळी हा प्रकार घडला. गेल्या वर्षीच त्याने निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी 4 कोटी रुपयांना विकत घेतली होती. भारतीय क्रिकेट संघाच्या निळ्या रंगाच्या शेड प्रमाणेच त्याने ही कार खरेदी केली आहे. या कारचा क्रमांक 0264 आहे. एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर असलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम 264 धावांचा आहे. हा विक्रम अद्याप कोणी मोडलेला नाही. याच क्रमांकाने त्याने ही कार विकत घेतली आहे.(pune Police)
भारतीय क्रिकेट संघ 15 ऑक्टोबर रोजी पुण्यात पोहोचला होता. 19 ऑक्टोबर रोजी भारत-बांगला देश हा महत्त्वपूर्ण सामना होणार आहे. त्यापूर्वी संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईला का गेला आणि तेथून सुपरकारने पुण्यात का आला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात विजय मिळाल्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी रोहित शर्मा अहमदाबादहून पवनहंसच्या हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाला होता. त्यानंतर तो 18 रोजी मुंबईहून या लॅम्बोर्गिनी कारने पुण्यात दाखल झाला. मात्र, ज्या वेगाने तो पुण्यात पोहोचला ते चिंताजनक आहे. मुळात आपल्या संघाला सोडून मुंबईत येण्याची गरज त्याला का भासली याचे उत्तर मिळालेले नाही. खरे तर विश्वचषक स्पर्धेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत सर्व संघ सहकारी एकत्र राहणे सर्वच दृष्टीने आवश्यक असते. पण रोहितने ही पद्धत धुडकावून जोखीम पत्करत अतिवेगाने कार चालवल्याबद्दल नाराजी आणि टीका व्यक्त झाली आहे.
हेही वाचा