पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमधील (उत्तर प्रदेश) उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी विजय उर्फ उस्मान हा पोलीस चकमकीत ठार झाला. प्रयागराज जिल्ह्यातील कौंधियारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी (दि.६) ही चकमक झाली. उस्मान याने उमेश पाल आणि कॉन्स्टेबलवर पहिली गोळी झाडली होती. विजय उर्फ उस्मान याची माहिती देणार्याला पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. चकमकीत नरेंद्र नावाचा हवालदार जखमी झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Umesh Pal murder Case)
उमेश पाल हा २००५ मध्ये बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये उमेश पाल आणि त्याचा सुरक्षारक्षक संदीप निषाद यांची धुमानगंजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. उमेश न्यायालयातून घरी परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. उमेश आपल्या घरासमोर कारमधून खाली उतरताच शुटरनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि गोळीबार केला. यानंतर बॉम्बस्फोटही घडवून आणला होता. उमेश पाल आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरक्षा रक्षक राघवेंद्र गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उमेश यांच्यावर उस्मान यानेच पहिली गोळी झाडली होती.
चकमकीनंतर पोलिसांनी उस्मानला प्रयागराज येथील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बद्री विशाल सिंग यांनी सांगितले की, जेव्हा उस्मानला आणण्यात आले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी अरबाज हाही पोलिस चकमकत ठार झाला आहे. उमेश पालच्या हत्येनंतर तिसऱ्या दिवशी अरबाज पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता. धुमनगंज परिसरातील नेहरू पार्कमध्ये ही चकमक झाली होते.
प्रयागराजमध्ये भरदिवसा झालेल्या या गोळीबार प्रकरणी उत्तर प्रदेशमधील राजकारण तापले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, ज्यांनी हे हत्याकांड घडवून आणले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. या प्रकरणात अतिक अहमदचे नाव समोर आले आहे, त्यानंतर सीएम योगी यांनी उत्तर प्रदेशमधील माफियांचे समूळ उच्चाटन करणार असल्याचा इशारा दिला होता.
भाजप नेते शलभ मणि त्रिपाठी यांनी उमेश पाल प्रकरणातील आरोपींच्या हत्येनंतर एक ट्विट केले आहे. ते चर्चेत आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, " म्हटलं होत ना की ते मातीत मिसळणार!! उमेश पाल आणि संदीप निषाद यांच्यावर पहिली गोळी झाडणारा मारेकरी उस्मान याचाही आज पोलीस चकमकीत मृत्यू झाला."
हेही वाचा