पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या पराभवानंतर खळबळ उडाली आहे (India vs West Indies). रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) विश्रांती देऊन संघ व्यवस्थापनाने काही प्रयोग केले जे जवळपास अपयशी ठरले. रोहित आणि विराटच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता, मात्र या दोघांनी निराशा केली. दुसरीकडे, सातत्याने संधी मिळत असलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सुद्धा अपयशी ठरला.
सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. द्रविड म्हणाले, सूर्यकुमार एक चांगला खेळाडू आहे, त्याने टी-20 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे यात शंका नाही, परंतु एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचे आकडे समाधानकारक नाहीत, याची सूर्याला देखील जाणीव आहे. मात्र तो अजूनही एकदिवसीय सामन्यात कसे खेळायचे हे शिकत आहे. मधल्या षटकांमध्ये फलंदाजी कशी करायची हे तो शिकत आहे. त्यामुळे आम्ही त्याला जास्तीत जास्त संधी देऊ इच्छितो. मात्र या संधींचा तो कसा फायदा उठवतो हे सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून आहे.'
विंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून सूर्याला (Suryakumar Yadav) स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी होती, पण त्याचा त्याला फायदा उठवता आला नाही. तो वनडेत सतत फ्लॉप होत आहे. विंडिजविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्याने 19 आणि 24 धावा केल्या. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 25 सामन्यांच्या 23 डावांमध्ये 23.8 च्या सरासरीने 476 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याची दोन अर्धशतके आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये विंडिजविरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावले होते.
शुबमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्या कामगिरीने द्रविड खूप खूश आहेत. त्यांनी दोन्ही खेळाडूंचा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील संघाचे महत्त्वाचे सदस्य असा उल्लेख केला. द्रविड (Rahul Dravid) म्हणाले, 'मी शुबमनची फारशी काळजी करणार नाही. तो खरोखरच चांगली फलंदाजी करत आहे. प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही खेळाडूंवर टीका करू शकत नाही. शुबमन आता तिन्ही फॉरमॅटचा महत्त्वाचा भाग आहे. ईशानने लक्षवेधी कामगिरी केली आहे. आता कसोटी सामन्यांची गणती केली तर हे त्याचे सलग तिसरे अर्धशतक आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो संधीचा फायदा घेतो. युवा खेळाडूंकडून आम्हाला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.'