पुढारी ऑनलाईन : प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या कर्मचाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये निवृत्त होईपर्यंत नरिमन हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा भाग होते. (Fali S Nariman passes away)
ज्येष्ठ वकील नरिमन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाचा राजीनामा दिला होता. जून १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या आणीबाणी जाहीर करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते.
प्रख्यात कायदेतज्ज्ञ नरिमन यांना १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वरिष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी फली नरिमन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत "एका युगाचा अंत" झाला असल्याचे म्हटले आहे.
फली नरिमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली आणि नंतर ते दिल्लीला गेले. ते १९९१ ते २०१० दरम्यान बार असोसिएशनचे अध्यक्षही होते.
त्यांचा मुलगा रोहिंटन नरिमन पुढे भारताचे सॉलिसिटर जनरल बनले आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.
हे ही वाचा :