पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली
कुतुबमिनार मध्ये पूजा करण्यास परवानगी देण्याच्या हिंदू पक्षाच्या मागणीला भारतीय पुरातत्व खात्याने (एएसआय) विरोध केला असून तशा आशयाचे प्रतिज्ञापत्र साकेत न्यायालयात दाखल केले आहे. कुतुबमिनारची ओळख बदलली जाऊ शकत नाही, असे एएसआयने म्हटले आहे.
आक्रमणकर्त्यांनी 27 हिंदू आणि जैन मंदिरांची तोडफोड करून कुतुबमिनार उभारल्याचे मानले जाते. अशा स्थितीत कुतुबमिनार परिसरात हिंदू आणि जैन देवतांची पुन्हा प्राणप्रतिष्ठाना केली जावी तसेच याठिकाणी पूजा अर्चा करण्यास परवानगी दिली जावी, अशी विनंती हिंदू पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली आहे. कुतुबमिनार परिसरात आजही विखंडीत मंदिरांचे भग्नावशेष व देवी-देवतांच्या मूर्ती ठिकठिकाणी पडल्याचे दिसून येते. याजागी हिंदू-जैन मंदिरे पाडून कुतुबमिनार बांधल्याचा एक फलकदेखील लावण्यात आलेला आहे.
कुतुबमिनारला 1914 साली संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालेला आहे. अशा स्थितीत त्याची ओळख बदलली जाऊ शकत नाही, तसेच पूजा-अर्चना करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका एएसआयने न्यायालयात घेतली आहे. दरम्यान पुरातत्त्व खात्याने कुतुबमिनार येथे नमाज म्हणण्यास परवानगी नाकारली असल्याचे येथील मशिदीचे इमाम शेर मोहम्मद यांनी सांगितले आहे. 13 मे पासून नमाज म्हणण्यास मनाई करण्यात आली असल्याचे मोहम्मद यांनी नमूद केले.
हेही वाचा :