नगर : पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना पीकनिहाय नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून एक रुपया भरुन पीकनिहाय विमा उतरवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. गहू, हरबरा व कांदा पिकांच्या नोंदणीसाठी 15 डिसेंबरची डेडलाईन आहे. अवकाळी व गारपिटीचा भरोसा नसल्याने पीकविमा गरजेचा झाला आहे.
अतिवृष्टी, दुष्काळ, पूर आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा योजनेच्या माध्यमातून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई दिली जात आहे. खबरदारी म्हणून शेतकर्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवली जात आहे.
संबंधित बातम्या :
सध्या जिल्ह्यात 2 लाख 49 हजार 520 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झालेली आहे. यामध्ये दीड लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, 41 हजार825 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. त्यामुळे ज्वारीचा विमा उतरविण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. आता रब्बी हंगामातील गहू, हरबरा आणि कांदा या पिकांचा देखील पीकविमा उपलब्ध आहे. त्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत शेतकर्यांना एक रुपया भरुन नोंदणी करता येणार आहे. उन्हाळी भुईमुगासाठी मात्र अद्याप तीन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत शेतकर्यांना पीकविमा उतरविता येणार आहे.
जिल्ह्यात गहू, हरबरा व कांदा पिक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून शेतकर्यांनी पीकविमा उतरावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कांद्यांसाठी 95 हजार रुपये संरक्षित रक्कम
रब्बी हंगामात ज्वारी बागायत या पिकांसाठी हेक्टरी 42 हजार 15 रुपये तर जिरायतीसाठी 39 हजार 218 रुपये हेक्टरी इतकी विमा संरक्षित रक्कम आहे. गव्हासाठी 47 हजार 528, कांदा पिकासाठी 95 हजार 156 रुपये तर उन्हाळी भुईमुगासाठी 38 हजार रुपये हेक्टरी विमा संरक्षित रक्कम असणार आहे.