चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांच्या शिकारीसाठी रात्रीच्या वेळी आलेला बिबट्या गोठ्या शेजारच्या विहिरीत पडल्यामुळे त्याची चांगलीच फजिती झाली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला नाशिक येथील वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अलगद पिंजऱ्यात कैद केले. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी बहादुरी (ता. चांदवड) येथे शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.
तालुक्यातील बहादुरी येथील भाऊसाहेब राजाराम शिरसाठ यांच्याकडे २० शेळ्या आहेत. या शेळ्या सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास शेत गट नंबर ६२९ मधील गोठ्यात बांधलेल्या होत्या. रात्रीच्या वेळी त्यांच्या शिकारीसाठी बिबट्या आला. मात्र, तो गोठ्यात न जाता दोन ते तीन फूट लांब अंतरावर असलेल्या विहिरीत पडला. मंगळवारी (दि.१२) शिरसाठ यांचा मुलगा किरण हा सकाळच्या सुमारास शेळ्यांच्या गोठ्यात गेला. त्यावेळी त्यास विहिरीतून काहीतरी आवाज ऐकू आला. त्याने विहिरीत डोकावून बघितले असता त्यास पाण्यात बिबट्या तरंगताना दिसला. शिरसाठ यांनी तत्काळ वनसंरक्षक वाल्मीक व्हरगळ यांना माहिती दिली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अक्षय म्हेत्रे, चांदवडचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरव वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, पारेगावचे वनरक्षक वाल्मीक व्हरगळ, विजय टेकणार, पूनम साळवे, वनसेवक वसंत देवरे, भरत वाघ, एकनाथ गांगुर्डे, वाहनचालक अशोक शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली.
बिबट्या मोठा असल्याने त्यास जेरबंद करण्यासाठी निफाड येथील सहआधुनिक बचाव पथकास बोलावले. यावेळी निफाडचे वनपरिमंडळ अधिकारी भगवान जाधव यांच्या टीमने पिंजरा विहिरीत सोडला असता बिबट्या अलगद पिंजऱ्यात जाऊन बसला. त्यावेळी वन अधिकाऱ्यांनी पिंजरा बंद करीत त्यास विहिरीतून बाहेर काढले. बिबट्या जेरबंद झाल्यावर शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हेही वाचा :