मुंबई; पुढारी ऑनलाईन डेस्क
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक डी-गँग म्हणजेच दाऊद गँगचे सदस्य आहेत. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचीही यामध्ये भागीदारी आहे. मलिकांचे मंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबई येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे दाऊद गँगशी संबंधित असून, या गँगचे ते सदस्यदोखील आहेत. मलिकांबरोबर मुख्यमंत्र्यांचीही यामध्ये भागिदारी असल्याने, मुख्यमंत्री आपले पद वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं (ED) दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयानं दखल घेतली. या आरोपपत्रात तपास यंत्रणेनं मलिकांविरोधात मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मलिकांविरोधात या गुन्ह्यात सामील असल्याचे पुरावे असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. नवाब मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे प्रथमदर्शी पुरावे दिसतायत, असं निरीक्षण मुंबईतल्या विशेष कोर्टानं नोंदवलं आहे. कोर्टाचे निरीक्षण आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपले मत व्यक्त केले.