हरिजनांसाठी देशातील सर्व मंदिरे खुली करण्यासंदर्भात महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान त्यांनी मुर्हादेवी मंदिर संस्थानला हरिजनांना प्रवेश देण्यासंदर्भात पत्र दिले होते. महात्मा गांधींच्या पत्राला प्रतिसाद देत त्याकाळी असलेल्या मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हरिजनांसाठी हे मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील पहिले सार्वजनिक न्यास म्हणून मुर्हादेवी मंदिर हे हरिजनांसाठी खुले झाले. स्वतः महात्मा गांधींनी मुर्हादेवी येण्याची तयारी दर्शवली होती. ते अंजनगाव सुर्जीपर्यंत पोहोचले देखील होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना अंजनगाव सुर्जी येथून परतावे लागले. त्यावेळी महात्मा गांधी यांनी 29 डिसेंबर 1933 रोजी अंजनगाव सुर्जी येथून मुर्हा देवी मंदिर संस्थानला पत्र लिहिले. या पत्रात मी मंदिरात येऊ शकलो नाही, याची खंत व्यक्त करीत हरिजनांना मंदिरात प्रवेश दिल्याने मंदिराच्या विश्वस्तांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो असा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र आज देखील मंदिराच्या विश्वस्तांकडे असून, या पत्राची भव्य प्रत मंदिर परिसरात लावण्यात देखील आली आहे.