पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने शनिवारी राज्याच्या 45 टक्के भागातून परतीला सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे व नागपूर या शहरातून प्रथमच एकाचवेळी मान्सून माघारी परतला आहे.आगामी तीन दिवसांत तो राज्यातून पूर्णपणे माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातून मान्सून माघारी परतण्यास सुरुवात झाली. गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातून, तर शुक्रवारी पुणे, नागपूर, अलिबाग या शहरांतून तो माघारी फिरण्यास सुरुवात झाली होती. तर शनिवारी मुंबई, पुणे, नागपूरमधून तो पुढे सरकला. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून, तापमान 35 अंशांवर गेले, तर रात्रीच्या तापमानात 1 ते 1.5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून माघारी फिरताच शहरांवर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहवयास मिळत आहे. उत्तररात्री 3 ते पहाटे 6 वाजेपर्यंत दाट धुके पडत आहे. तर सकाळी 7 ते 9 दरम्यान हलके धुके जाणवत आहे .पहाटे मोठ्या प्रमाणावर दवबिंदू पडलेले पाहावयास मिळत आहे.
हेही वाचा