मुंबई; पुढारी वृत्तसेवा: शरद पवार हे देशातील प्रमुख नेते असून, येणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता ते सक्रिय राहणे अत्यंत आवश्यक आहे. शरद पवार यांच्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे त्यांनीच अध्यक्षपदावर राहावे ही आमची आणि देशातील प्रमुख नेत्यांची भावना आहे. त्यामुळे ते हे मान्य करतील आणि राजीनामा मागे घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.
शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी भावना (Jayant Patil) व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका होईपर्यंत तरी शरद पवार यांनी पद सोडू नये. त्यांनी पद सोडण्याची ही वेळ नाही अशी सर्वांची भावना आहे. तशीच भावना आमचीही असून, पक्षात शरद पवार यांना दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. शरद पवार या भावना समजून घेतील आणि आपला राजीनामा मागे घेतील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळल्यानंतर, विरोधकांकडून हा राष्ट्रवादीचा राजकीय स्टंट होता अशी टीका (Jayant Patil) सुरू झाली आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न होता. केवळ पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधक असे आरोप करत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत घडामोडीचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.