मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी शिंदे म्हणाले, 'भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला ध्वजारोहणाची संधी मिळाली, हे भाग्य समजतो. प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहतो. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांना मी अभिवादन करतो.'
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोविडचं संकट गेलेलं नाही. धार्मिक सण काळजी घेऊन जल्लोषात साजरा करू. प्रत्येकाच्या घरावर तिरंगा दिसतोय. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला आहे. पाऊस, अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्याचे वेगाने पंचनामे सुरू आहेत. १५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. २८ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. १५ हजार नागरिकांना सुरळीत स्थळी हलवले आहे. पूर अतिवृष्टी यावर शाश्वत उपायांसाठी दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत ३ हेक्टरपर्यंत वाढवली आहे.
जलसंपदा विभागामार्फत नद्यांचे गाळ काढण्याचे शास्त्रशुद्ध कायर्क्रम प्रयोजित आहे. ओबीसी, धनगर आरक्षणासाठी फायदे मिळून देण्यासाठी शासन वचनबध्द असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या विकासाठी केंद्र सरकारशी संवाद झाल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, पिक पध्दतीत विविधीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात येईल. राज्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवणार आहे. राज्यात ग्रीनफिल्ड शहरे स्थापन करण्यावर भर देत आहोत. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय जल मिशान, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजना राबवण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या घरासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात रोजगार वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कांदळवनाचे संरक्षण, सागरी किनाऱ्याचे संवर्धन, नागरिकांना रोजगाराचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विद्युत वितरण प्रणालीत सुधारणा करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील भूमिहिन लाभार्थींना घरासाठी जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आलीय. अमृतमहोत्सवी देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे आश्वासन देत आहे.
गेल्या अडीच वर्षात कोरोना संकट आलं, या काळानंतरचा कोविडचा बुस्टर डोस लवकर घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यंदा दहिहंडी आणि गणेशोत्सव जल्लोषात साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्टअप यात्रेची नुकतीच सुरूवात झालीय. सध्य परिस्थिती आणि आगामी काळातील वाटचालीचा आढावा त्यांनी घेतला. अमृत महोत्सवी राज्याची गतिमान वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.