चिंतेची बाब ! दमदार पाऊस होऊनही पाणीसाठ्यात नगण्य वाढ

चिंतेची बाब ! दमदार पाऊस होऊनही पाणीसाठ्यात नगण्य वाढ
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  तब्बल दोन आठवड्यांनंतर रविवारी (दि. 17) पानशेत-वरसगाव खोर्‍यासह रायगड जिल्ह्यालगतच्या क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. खडकवासला-सिंहगड भागात मात्र रिमझिम पावसाने दुपारी उघडीप दिली. पावसामुळे धरणसाठ्यात किंचितच भर पडली. सध्या पडत असलेल्या पावसामुळे पाणीटंचाईचे संभाव्य संकट काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. दिवसभरात वरसगाव येथे सर्वाधिक 25 मिलिमीटर पाऊस पडला. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 27.27 टीएमसी म्हणजे 93.57 टक्के पाणीसाठा होता. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाचा जोर ओसरला. असे असलेतरी चारही धरण क्षेत्रांत पावसाळी वातावरण होते.

संबंधित बातम्या : 

खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले, 'जवळपास दोन आठवड्यानंतर आज धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला. उन्हामुळे जमीन तापल्याने जमिनीत पाणी मुरत आहे, त्यामुळे धरणसाठ्यात अल्प प्रमाणात भर पडली. पानशेत खोर्‍यात अद्यापही रिमझिम असल्याने उद्या सकाळपर्यंत पाणीसाठ्यात थोडीफार वाढ होऊ शकते.

पावसामुळे शेतकर्‍याला दिलासा
धरणक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची शक्यता असताना पाऊस पडला नाही. मात्र, रविवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने भातपिकांसह खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे, त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मोगरवाडी येथील शेतकरी देविदास बेलुसे म्हणाले, 'भातपिके वाचणार आहेत. उन्हामुळे भातखाचरे कोरडी ठणठणीत पडली होती. पावसामुळे थोडा दिलासा आहे. मात्र, अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.' रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 20 मि. मी., पानशेत येथे 24, वरसगाव येथे 25 व खडकवासला येथे 7 मि. मी. पाऊस पडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news