पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात गेल्या 24 तासांत बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असला तरी त्याचा जोर विदर्भात जास्त राहणार असून, उर्वरित राज्यात कमी राहील.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयाच्या पायथ्यापासून ते पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेशपर्यंत मोठा पाऊस झाला. दरम्यान, सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस झाला. दरम्यान, या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे 27 सप्टेंबरपर्यंत फक्त विदर्भात जोर राहील तर उर्वरित राज्यात पावसाचा कमी जोर राहील.
मान्सून 10 ऑक्टोबरपर्यंत परतणार
सध्याचा पाऊस हा मान्सूनचाच असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. परतीचा पाऊस राजस्थानातून सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून जाण्यास 5 ते 10 ऑक्टोबरचा कालावधी उजाडेल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामान विभाग प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिली.