पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापर्वी होणार असून आमच्यात कोणीही नाराज नाही, अशी माहिती रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीसोबत उद्धव ठाकरे यांच्या युतीचा फटका ठाकरे गटाला बसणार असून, त्यांच्यासोबत असणारी सर्व हिंदुत्ववादी मते बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे वळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शनिवार (दि.४) पंढरपूर येथे खाkगी दौऱ्यानिमित्त आले असता भुमरे म्हणाले, " सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याचे आरोप चुकीचे आहेत. असे असते तर पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार झाला नसता. मंत्रीपद हे सर्वांनाच पाहिजे असते. मात्र ते सर्वांना मिळू शकत नाही हे वास्तव आहे. मात्र मंत्रिपदासाठी शिंदे गटात कोणीही नाराज नाही."
शिल्लक राहिलेले ठाकरे गटातील नेते सध्या शिंदे साहेबांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचे प्रवेश झालेले दिसतील, असा टोलाही भुमरे यांनी लगावला.
विधानपरिषद निवडणूक निकालाचा कोणताही फटका आम्हाला बसला नाही. आमची ताकद काय आहे हे २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येऊन आम्ही दाखवून देऊ. संभाजीनगर येथील लोकसभेची जागा बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून, येथे कोणीही दावा केला तरी देखील ही जागा शिंदे गट लढवणार आणि जिंकणार आहे. पक्षाने आदेश दिला तर संभाजीनगर लोकसभा लढवण्याची आपली तयारी असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
फोन टॅपिंग टाळण्यासाठी आयफोन वापरण्याबाबत अंबादास दानवे यांनी सुरु केलेली चर्चा ही निरर्थक असून, फक्त प्रसिद्धीसाठी असली वक्तव्य करत असतात, असा टोलाही त्यांनी दानवे यांना लगावला.
हेही वाचा :