पुढारी ऑनलाईन: जम्मू-काश्मीरच्या दक्षिणेकडील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत आज (दि.०४) पुन्हा दोन दहशतवादी ठार झाले. हे दोघेही लष्कर-ए-तैयबाचे (एलईटी) दहशतवादी होते, अशी माहिती येथील पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. काल (दि.०३) जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल भागात देखील चकमक झाली होती. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील वानिगम पायीन क्रीरी भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना कारवाई करत गुरुवारी (दि.०४) पहाटे तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत येथील स्थानिक दोन दहशतवादी ठार झाले. दशतवाद्यांकडून 01 एके 47 रायफल आणि एक पिस्तूल यासह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती, पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे स्थानिक दहशतवादी आहेत. ते प्रतिबंधित दहशतवादी संघटना एलईटीचे सदस्य आहेत. हे दोघेही शोपियान जिल्ह्यातील असून, त्यांची नावे शाकीर माजिद नजर आणि हनान अहमद सेह अशी आहेत. मार्च २०२३ मध्ये दोघेही दहशतवादात सामील झाले होते, अशी माहिती आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती काश्मीरच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.