पवारांच्या घरावर हल्ला म्हणजे पोलिस यंत्रणेचे अपयश : देवेंद्र फडणवीस

File Photo
File Photo

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर काल शुक्रवारी एसटी कर्मचारी आंदोलकांनी दगड, चपला भिरकावल्या होत्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरांवर लोक चाल करुन जातात मग पोलिस काय करत होते? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

हे भयावह दृश्य होते. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. कालची घटना ही पोलिसांचे अपयश आहे. माध्यमांना या घटनेची माहिती होते तर पोलिस काय करत होते? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ज्यानी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ते आपल्याच राज्यातील आहेत. त्यांना कोणीतरी शिकवले होते. त्यांची माथी भडकवण्याचे काम कोणीतरी करत आहे. या सगळ्या घटनेत पोलिस यंत्रणा आणि गृह खाते कसून तपास करत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागच्या दोन दिवसांपुर्वी कोर्टाने निकाल दिला होता. त्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत जल्लोष केला. मग शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणे चुकीचे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला होतो. इतके धाडस दाखवण्यामागे नक्कीच कोणीतरी मास्टरमाईंड असला पाहिजे. या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जात तपास करून महाराष्ट्राला 'दूध का दूध, पाणी का पाणी' करून दाखवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मनसेचे नेते वसंत मोरे यांना मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन… काय असणार वसंत मोरे यांची भूमिका?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news