पुढारी ऑनलाईन डेस्क :
मी अयाेध्येत कोणतेही राजकारण करायला आलो नाही. केवळ श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असे स्पष्ट करत अयोध्येत भव्य महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रव्यवहार करणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी दिली. अयोध्या दौऱ्यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत, शिवसेना आमदार निलम गोऱ्हे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) म्हणाले, जनतेला दिलेलं वचन पाळणं हेच शिवसेनेचे हिंदुत्त्व आहे. आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा व्हावी हीच प्रभू रामचरणी प्रार्थना आहे. संसदेत राम मंदिरासाठी कायदा झाला नाही. कोर्टाच्या निर्णयामुळेच राम मंदिर होतय हे राम भक्तांसाठी आनंदाची गोष्ट आहे.
सध्या राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्टातून येणाऱ्या राम भक्तांसाठी अयोध्येत १०० खोल्यांचे भव्य महाराष्ट्र सदन उभारण्यात यावे यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रव्यवहार करणार आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.