नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा प्रसार भारतीचा निर्णय अन्यायकारक आहे, असा संताप साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयासोबत पत्रव्यवहार करीत निर्णयाला त्वरीत स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने अगोदर मराठीसह सर्व भारतीय भाषांमधील दिल्लीच्या आकाशवाणी भवनातून प्रसारित होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे बंद करीत राज्यांच्या राजधानीत पाठवली. यानंतर हे बातमीपत्र प्रादेशिक मध्ये समाविष्ट करण्यात आले. मुंबई ऐवजी ते पुण्यातून प्रसारित केले जावू लागले. आता या मराठीतून बातम्या देणारा प्रादेशिक वृत्त विभागच बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला असून येत्या १८ जून पासून तो तातडीने अंमलात आणण्याचे दिलेले आदेश अन्यायकारक असल्याचे मत मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ.जोशी यांनी व्यक्त केले.
याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना पत्रव्यवहार करीत तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली असल्याचे देखील जोशी म्हणाले. विशेष म्हणजे २०१६ मध्ये तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा विभाग बंद होणार नाही, अशी ग्वाही दिली होती.पंरतु,आता हा विभाग तातडीने बंद करण्याचे आदेश काढण्यात आल्याचा दावा जोशी यांनी केला.
हेही वाचा