![किरीट सोमय्या](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F09%2Fkirit-somaiya.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई: पुढारी ऑनलाईन : "पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. 'त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे', असंही ते म्हणाले.
यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या नावाने दाखल करण्यात आलेली एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का, असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी विचारला. याविरोधात आपण खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. माझ्या नावाने बोगस एफआयआर दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर 23 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या.
शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला. हा एफआयआर बोगस असून त्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?