ठाणे : पुढारी वृत्तसेवा; ठाण्याची मनाची हंडी समजल्या जाणाऱ्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनर झळकवण्यात आले आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी सोबत जाणार का? असा प्रश्न ठाकरे गटाला या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातील दही हंडी उत्सवात उत्सवाबरोबर बॅनर बाजीतून राजकीय टोलेबाजीदेखील करण्यात येत आहे.
ठाण्यात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पहिला मिळाला. दोन वर्षानंतर हा उत्सव होत असल्याने राजकीय मंडळींनी लाखोंची बक्षिसे लावली आहे. ठाण्यात मानाची समजली जाणारी टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. टेंभी नाक्यावरील हा उत्सव आनंद दिघे यांनी सुरू केला होता, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या उत्सवाला विशेष उपस्थिती लागणार असल्याने या उत्सवाकडे लक्ष लागले होते.
अपेक्षेप्रमाणे या उत्सवात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे यांनी टोला लागावण्यात आला आहे. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांची निष्ठतेची दहीहंडी असा प्रचार करण्यात आला असल्याने समोरासमोर असलेल्या या दोन्ही उत्सवात उत्सव आणि राजकीय संघर्षदेखील पाहायला मिळाला.