![‘शकुनी निती’मुळे इंडिया आघाडीचा विजय : चंद्रशेखर बावनकुळे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FChandrasekhar-Bawankule.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात भाजपाचे नेते निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस हेच आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतीने फडणवीस पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू करतील आणि महाराष्ट्रात महायुतीच्या २०० जागा निवडून येतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, संपूर्ण पक्ष, आमदार व बुथ लेव्हलचा कार्यकर्ता फडणवीस यांच्यासोबत उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत कपट व शकुनी नीतीचा अवलंब करून जात व धर्माचे राजकारण करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला. मविआने मतदारांमध्ये संविधान बदलविणार, असा बिनबुडाचा प्रचार केला. मराठा समाजाला महायुती आरक्षण विरोधात असल्याचे सांगितले. इंडिया आघाडी जातीचे राजकारण करूनच विजय मिळवू शकते, त्यांच्याकडे विकासाबाबत बोलण्यासारखे काहीच नाही. मविआच्या एकाही उमेदवाराने विकासाच्या मुद्दयावर मते मागितली नाहीत. जनता एकदा भ्रमित होऊ शकते, वारंवार होणार नाही. विकासाचे राजकारण देशाला पुढे घेऊन जाणार आहे. आता ते ईव्हीएम वर का बोलत नाहीत?, असा सवालही माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी केला.
हेही वाचा :