औरंगजेबच्या ‘उदो उदो’पेक्षा रामराम चांगलं; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा   | पुढारी

औरंगजेबच्या 'उदो उदो'पेक्षा रामराम चांगलं; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा  

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी भूमिका सोडून राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहेत. अडीच वर्षे सत्तेच्या काळात त्यांनी कोकणला दमडीही दिली नाही. कोकण वादळात सापडलं तेव्हा उद्धव ठाकरे घरात बसून होते. महापुरात उद्धव ठाकरेंच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम चांगलंच आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव  ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. यासंदर्भात ते बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासियांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेत चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली का ? असाही सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना केला.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. आता तुम्ही कितीही थापा मारल्या, तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा :

Back to top button