पुढारी ऑनलाईन डेस्क : Climate Change : जगभरात हवामान बदलाचे परिणाम आपण पाहत आहोत. भविष्यातील प्रचंड नुकसान कमी करण्यासाठी आणि मानवी जीवन वाचवण्यासाठी, नैसर्गिक संसाधनांचा विवेकी वापर करत ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, अक्षय ऊर्जेसाठी अधिक सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे आणि जीवाश्म इंधन शक्य तितक्या लवकर थांबवणे आवश्यक आहे. एनर्जी जर्नलने हवामान बदलामुळे पुढील शतकात एक अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले आहे. (Climate Change)
एनर्जी जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक तापमानवाढ ही सध्याची गंभीर समस्या आहे. जगाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. नजीकच्या काळात जागतिक तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास पुढील शतकात सुमारे एक अब्ज लोकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. तेल आणि वायू उद्योग ४०% पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जनासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे, असे संशोधकांनी सांगितले आहे. याचा परिणाम जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसह अब्जावधी लोकांच्या जीवनावर होत आहे, असे एनर्जी जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
या अभ्यासात, कार्बन उत्सर्जन तातडीने कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय सरकार, कॉर्पोरेट आणि नागरिकांच्या पातळीवर त्वरीत कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या अभ्यासात सहभागी असलेले कॅनडातील वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठाचे प्रोफेसर जोशुआ पियर्स म्हणाले की, हवामान बदल रोखण्यासाठी आपल्याला जलद गतीने काम करण्याची गरज आहे.
भविष्यातील प्रचंड नुकसान कमी करण्यासाठी आणि मानवी जीवन वाचवण्यासाठी, मानवतेने ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, अक्षय ऊर्जेसाठी अधिक सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे आणि जीवाश्म इंधन शक्य तितक्या लवकर थांबवणे आवश्यक आहे. पुढे म्हटले आहे की, भविष्यात काय होईल हे सांगता येत नसले तरी हवामान बदलामुळे दर १० पैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा