पुढारी ऑनलाईन : भारताचे सध्याच्या सरन्यायाधीश यू यू लळित यांनी नुकतीच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केली आहे. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड हे ५० वे सरन्यायाधीश होणार आहेत. सरन्यायाधीश यू यू लळित यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांनी भारताच्या पुढच्या सरन्यायाधिशाच्या नावाची शिफारस केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश यू यू लळित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना आज सकाळी यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली होती. यावेळी लळित यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची शिफारस करणारे पत्र सर्वाच्या उपस्थितीत सुपूर्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी भावी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने या नावाला होकार दिला तर न्या. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश ठरणार आहेत.
उच्च न्यायपालिकेच्या सदस्यांच्या नियुक्तीचे नियमन करणाऱ्या मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, भारताच्या सरन्यायाधीशांच्या पदावर नियुक्त करण्यात येणारी व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असावी. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. भारताचे ५० वे सरन्याधिश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांचा असणार आहे. सध्याचे सरन्यायाधीश लळीत यांना भारताचे सरन्यायाधीश म्हणून अवघा ७४ दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.
सर्वोच्च न्यायालयात एखाद्या न्यायमूर्तीनी शपथ घेतल्यानंतर ते सरन्यायाधीश बनणार की नाही आणि बनले तर त्यांना किती कालावधी मिळणार, हे लगेच स्पष्ट होत असते. सध्याच्या रेकॉर्डनुसार २०२७ मध्ये देशाला महिला सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांना ही संधी मिळाली तर त्या २७ दिवसांसाठी सरन्यायाधीश पदावर राहतील. नागरत्ना यांचे वडील ई. एस. वेंकटरामैय्या यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलेले आहे.