रायगड : कारची बसला धडक, तिघे ठार तर दोन जखमी | पुढारी

रायगड : कारची बसला धडक, तिघे ठार तर दोन जखमी

महाड (जि.रायगड), पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर दासगांवनजिक मध्यरात्री कार आणि बसची धडक झाली आहे. या अपघातात चालकाने अचानक कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घेतल्‍याने धडक झाली. यामध्ये कारमधील एका प्रवाशाचा जागीच ठार झाला तर दोघांना उपचारांसाठी घेवून जात असताना रस्त्यात मृत्यू झाला.

एम.एच. ०५, डीएस ६८३१ क्रमांकाची बलेनो कार मुंबईकडे जात होती. चालक दीपक सीताराम पाटील याने अचानक कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घेतली. दरम्‍यान कारवरील त्‍याचा ताबा सुटल्‍याने समोरुन येत असलेल्या एम.एच.४८,बीएम-६२९९ या खासगी बसवर आदळली.

या अपघातात बलेनोमधील संदीप सीताराम पाटील (वय ४०) याचा जागीच मृत्‍यू झाला, तर अनिल दत्ताराम राणे (वय ४५) आणि साधना निलेश राऊत (वय ४५) यांना मुंबईकडे रूग्‍णालयात घेवून जात असताना रस्त्यात या दोघांचा मृत्यू झाला. कारचालक दीपक पाटील (वय ४८) आणि सुगंधा पाटील (वय ७०) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत.

तसेच, बसचालक अग्नेल मधू शेजूळ (वय ३४) याने कारचालक दीपक पाटील याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०४अ, ७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा  

Back to top button