

China airbase at India's Chickens Neck
नवी दिल्ली : चीन बांगलादेशातील लालमोनिरहाट येथील दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या जुन्या हवाई तळाचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करत असल्याची माहिती आहे. हा हवाई तळ भारताच्या सीमेपासून केवळ 12-15 किलोमीटर अंतरावर असून, सध्या बांगलादेश हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु गेल्या अनेक दशकांपासून निष्क्रिय आहे.
हे ठिकाण भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरपासून केवळ 135 किलोमीटर अंतरावर आहे – ज्याला भारताचा ‘चिकन’स्नेक’ म्हटले जाते जो ईशान्य भारताचा मुख्य भूमीशी संपर्क राखणारा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
अलीकडेच काही चिनी अधिकारी या ठिकाणी गेले होते, ज्यामुळे या ठिकाणामध्ये बीजिंगचा वाढता रस दिसून येतो. हवाईतळाचा नेमका उद्देश नागरी आहे की लष्करी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; पण या इतक्या जवळ चिनी उपस्थितीमुळे भारताच्या सामरिक असुरक्षिततेत वाढ होऊ शकते.
हा हवाईतळ मूळतः 1931 साली ब्रिटिशांनी बांधला होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दक्षिण-आशियातील मित्र राष्ट्रांच्या फॉरवर्ड बेस म्हणून वापरला जात होता अशी माहिती आहे. फाळणीनंतर पाकिस्तानने 1958 मध्ये थोड्यावेळासाठी नागरी वापरासाठी तो पुन्हा सुरु केला.
1166 एकरावर पसरलेल्या या विस्तीर्ण तळावर, चार किलोमीटरची धावपट्टी आणि मोठे टारमॅक असूनही, हा तळ उपेक्षितच राहिला आहे.
2019 मध्ये, बांगलादेशच्या शेख हसीना सरकारने या ठिकाणी एक एव्हिएशन व एअरोस्पेस विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली, जे आता बांगलादेश हवाई दलाच्या अंतर्गत कार्यरत आहे.
अलीकडेच, मोहम्मद युनूस यांच्या आंतरिम प्रशासनाने लालमोनिरहाट आणि इतर पाच ब्रिटिशकालीन हवाईतळांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना मांडली आहे – आर्थिक प्रगतीस चालना देण्याच्या उद्देशाने. उर्वरित हवाईतळांमध्ये इश्वर्दी, ठाकुरगाव, शमशेरनगर, कोमिल्ला आणि बोग्रा यांचा समावेश आहे.
सिलीगुडी कॉरिडॉर, ज्याला ‘चिकन्स नेक’ म्हणतात, हा केवळ 22 किलोमीटर रुंद आहे आणि तो भारताच्या ईशान्येकडील आठ राज्यांना मुख्य भूमीशी जोडतो. या मार्गाचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.
या मार्गावरील कोणतीही अडचण भारताच्या प्रादेशिक अखंडतेला धोका ठरू शकते. भारत-भूतान-चीन त्रिसंधी परिसरात चीनच्या वाढत्या लष्करी उपस्थितीमुळे आधीच तणाव निर्माण झाला आहे. 2017 मधील डोकलाम संघर्षाने या मार्गाच्या असुरक्षिततेचे वास्तव दाखवून दिले आणि भारताला त्याचे संरक्षण अधिक बळकट करण्यास प्रवृत्त केले.
बांगलादेशातील चीनचे वाढते अस्तित्व केवळ लष्करीच नाही, तर आर्थिकदृष्ट्याही स्पष्ट आहे. चीनच्या कंपन्या रंगपूरजवळ कारखाने व सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहेत. एका ढाकास्थित पत्रकारानुसार, “हे कारखाने जवळजवळ पूर्णपणे चिनी कर्मचाऱ्यांद्वारे चालवले जातात; स्थानिक मजुरांचा सहभाग फारच कमी आहे.” चीन बांगलादेशात सीमावर्ती भागांत पायाभूत सुविधा आणि संपर्क प्रकल्पांमध्येही सक्रिय आहे.
बांगलादेशाच्या चीन आणि पाकिस्तानची गट्टी भारतासाठी धोकादायक आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या लालमोनिरहाट भेटीपूर्वी, एक पाकिस्तानी लष्करी-गुप्तचर प्रतिनिधीमंडळाने बांगलादेशातील काही सीमावर्ती भागांची पाहणी केली होती, असे सांगतिले जाते.
इतिहासात, पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेचे भारतातील ईशान्य भागातील सशस्त्र फुटीरतावादी गटांशी संबंध होते. जे 2009 मध्ये अवामी लीग सरकारने कारवाई करत निष्क्रिय केले.
NDTV च्या माहितीनुसार, 2024 पासून चीनने लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल (एलएसी) जवळ सहा नवीन हवाई तळ उभारले आहेत, ज्यात इंजिन टेस्ट पॅड्स, सुधारित धावपट्ट्या आणि ड्रोनसाठी सुविधा यांचा समावेश आहे.
टिंग्री, लुंजे, बुरांग, युटियन आणि यारकंद येथील बेसमध्ये मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. हे तळ एलएसीपासून केवळ 25 ते 150 किमीवर आहेत. त्यामुळे पीएलए एअर फोर्स तातडीने आपले सैनिक पुढे तैनात करू शकते.
चीन उच्च उंचीवरचे अडथळे पार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, ड्रोन, एअरलिफ्ट तंत्र आणि इंधन भरण्याची यंत्रणा विकसित करत आहे. “चीनचा ‘एअरबेस क्लस्टर’ संकल्पना त्याच्या तात्काळ लढाई क्षमतेला अनेकपट वाढवते,” असे खोसला स्पष्ट करतात.
भारतीय वायुदलाने अंबाला व हासीमारा यासह अनेक तळांत सुधारणा केली आहे. मात्र चीनने सुमारे 195 पाचव्या पिढीतील J-20 स्टेल्थ फायटर्सची तैनाती केली असून, गुणवत्ता आणि प्रमाणात तो भारताच्या पुढे आहे. भारताच्या ताफ्यत स्वतःचे स्टेल्थ फायटर अद्याप नाही.
2024 च्या अखेरीस, चीनने दोन नवीन स्टेल्थ फायटर्स उघड केले – ज्यांना पाश्चात्य विश्लेषकांनी J-36 व J-50 असे कोडनेम दिले आहे. हे विमान AI व ड्रोनसह कार्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
लालमोनिरहाट येथील हवाई तळाचे पुनरुज्जीवन हे भारताच्या अत्यंत संवेदनशील सिलीगुडी कॉरिडॉरजवळ घडत आहे, आणि त्यामुळे भारताला सामरिक व राजकीय दोन्ही प्रकारची आव्हाने भेडसावू शकतात.
चीनचा वाढता हस्तक्षेप आणि बांगलादेशातील बदलती राजकीय समीकरणे ही भारतासाठी सावधानतेचा इशारा ठरू शकते.