

Javed Akhtar on Pakistan
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी मुंबईत झाले. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार, कवी, पटकथाकार, संवेदनशील लेखक जावेद अख्तर देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर जहरी शब्दात टीका केली.
पाकिस्तान आणि नरक असे दोनच पर्याय असतील तर मी नरक स्विकारेन, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील परिस्थितीची लक्तरे वेशीवर टांगली. त्यांच्या या वक्त्तव्याचे नेटीझन्समधून स्वागत होत आहे.
पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना जावेद अख्तर यांनी आपल्या वक्तव्यांमुळे आणि खुले विचार मांडल्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंनी आपल्यावर होणाऱ्या टीकेबद्दल भाष्य केले.
जावेद अख्तर म्हणाले, "दोनही बाजूंकडून मला शिव्याशाप मिळतात. एक मला 'काफिर' म्हणतो आणि नरकात जाशील असं म्हणतो. तर दुसरा मला 'जिहादी' म्हणतो आणि पाकिस्तानला निघून जा असं सांगतो. त्यामुळे जर माझ्याकडे नरक किंवा पाकिस्तान, फक्त हे दोनच पर्याय असतील, तर मी नरकात जाणं पसंत करीन."
अख्तर पुढे म्हणाले, "दोनही बाजूंनी मला टीका सहन करावी लागते. हे एकतर्फी नाही. मी हे मान्य न केल्यास मी कृतघ्न ठरीन. कारण खूप लोक माझं समर्थनदेखील करतात, माझं कौतुक करतात, प्रोत्साहन देतात.
पण हेही तितकंच खरं आहे की दोन्ही बाजूंतील अतिरेकी विचारसरणीचे लोक मला शिव्या घालतात. हीच वास्तव परिस्थिती आहे. जर त्यांपैकी एक जरी गप्प झाला, तरी मला वाटेल की मी कुठेतरी चूक केली असावी."
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी दहशतवादी अजूनही पाकिस्तानमध्ये मुक्तपणे फिरत आहेत, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी चक्क पाकिस्तानात लाहोरमध्ये केले होते. या वक्तव्यामुळे पाकिस्तानात मोठी प्रतिक्रिया उमटली. अनेक पाकिस्तानी कलाकार आणि पत्रकारांनी त्यावर टीका केली, पण भारतात मात्र त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचं स्वागत झालं होतं.
जावेद अख्तर त्यांच्या विचारी आणि बिनधास्त मतांसाठी ओळखले जातात. त्यांच्या लिखाणातून दिसते की ते चिकित्सक आणि अभ्यासू आहेत. आपली मते मांडताना ते अजिबात कुणाची भीडमुर्वत बाळगत नाहीत.
धर्माविषयीदेखील बोलताना ते कठोर शब्दात त्यातील कर्मकाडांवर प्रहार करतात. त्यामुळे कधीकधी ते कट्टर धार्मिक विचारसरणी असणाऱ्यांच्या टीकेच्या रडारवरही येतात. पण तरी, त्यांच्यासारखा लेखक काय म्हणतो याची दखल नेहमीच घ्यावी लागते.
दरम्यान, जावेद अख्तर राज्यसभेचे सदस्य देखील होते. 22 मार्च 2010 पासून 21 मार्च 2016 पर्यंत कार्यरत होते. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली होती.
"नरकातलं स्वर्ग" हे पुस्तक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या तुरूंगवासाच्या काळात लिहिले असून, त्यामध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील अनेक अनुभव शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकातील लिखाणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचे मोहोळ उठले आहे.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि इतर अनेक राजकीय नेते उपस्थित होते.