Hardeep Singh Nijjar death | ‘कॅनडा’कडून भारतीय राजदूताची हकालपट्टी; भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर, काय आहे प्रकरण? | पुढारी

Hardeep Singh Nijjar death | 'कॅनडा'कडून भारतीय राजदूताची हकालपट्टी; भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर, काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन : खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहे. हरदीप सिंग निज्जर याची १८ जून रोजी कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला आहे. दरम्यान, या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येच्या आरोपावरून कॅनडाने १८ सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. या राजनैतिक कारवाईमुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण झाला आहे. (Hardeep Singh Nijjar death)

संबंधित बातम्या 

पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेच्या आपत्कालीन सत्रात बोलताना सांगितले की, त्यांच्या सरकारवर ब्रिटिश कोलंबियामध्ये जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येशी भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचा आरोप आहे. त्यांनी भारत सरकारला हे प्रकरण मिटवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितले की, या प्रकरणी ट्रूडो सरकारने तातडीने कारवाई केली आहे. “आम्ही एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याला कॅनडातून हटवले आहे,” असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचे नाव न घेता सांगितले.

जोली पुढे म्हणाल्या की, कॅनडातून हटविण्यात आलेला भारतीय हा कॅनडामधील भारताची परदेशी गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चा प्रमुख आहे.

निज्जर याला भारताने एक वाँटेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. १८ जून रोजी व्हँकुव्हरच्या उपनगरात सूर्रे येथे त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या ठिकाणी शिख समुदायाचे वास्तव आहे. निज्जरवर भारतात अनेक हल्ले केल्याचा आरोप होता.

या हत्या प्रकरणावरुन भारत आणि कॅनडामधील द्विपक्षीय संबंधात तणाव वाढला आहे. सुर्रे येथे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा कॅनडाचा आरोप भारत सरकारने मंगळवारी फेटाळून लावला. सार्वजनिक प्राधिकरणाने कॅनडाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. भारताची कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठोस जबाबदारी राहिली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

“आम्ही कॅनडाच्या प्रमुखांनी संसदेत जे काही वक्तव्य केले आहे त्याचे खंडन करतो. कॅनडातील कोणत्याही वाईट कृत्यामध्ये भारताचा हात असल्याचा दावा हास्यास्पद आणि मुर्खपणाचा आहे,” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडून जारी करण्यात आले आहे.

भारताकडून जोरदार प्रत्युत्तर, भारतातील उच्चायुक्तांना देश सोडून जाण्यास सांगितले

दरम्यान, हरदीप सिंग निज्जर हत्येच्या आरोपांच्या वादात भारतानेही जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली आहे. भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांची हकालपट्टी केली आहे. कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आले आणि त्यांना भारत सरकारच्या कारवाईची माहिती देण्यात आली. संबंधित उच्चायुक्तांना पुढील पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button