

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तान संसदेमधील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रपतींना संसद ( Pakistan Assembly ) बरखास्त करण्याची मागणी केली. त्यानुसार राष्ट्रपतींनी पाकिस्तान संसद बरखास्त करण्याचे आदेश दिले असून, आता पुढील ९० दिवसांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत.
पाकिस्तान संसदेचे उपसभापती कासिम खान सूरी यांनी घटनेतील कलम पाचमधील नियमाचा हवाला देत अविश्वास प्रस्ताव मतदाना आधीच फेटाळून लावला. संसदेचे सभापती असद कैसर यांच्यावरही अविश्वास प्रस्ताव मांडल्यानंतर सुरी यांनी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली होती.
इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव विना मतदानच फेटाळण्यात आला. त्यानिर्णयाविरोधात आता विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संसद परिसरात त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या घटनेचा अवमान केला आहे. याविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत. आम्ही संसदेतच धरणे आंदोलन करणार आहोत.
उपसभापती सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य ठरवत ताे फेटाळला. यानंतर २५ एप्रिलपर्यंत संसदंचे कामकाज तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली हाेती. पाकिस्तान संसदेमध्ये अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मी राष्ट्रपतींना विनंती करतो की, त्यांनी हे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि नव्याने निवडणुका घ्यावात. तसेच देशातील जनतेने आता निवडणुकीची तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले हाेते.
हेही वाचलं का?