

पणजी : काव्या कोळस्कर
राजधानी पणजीमध्ये चहाचे वेगळेच महत्त्व आहे. सकाळच्या चहापासून ते दिवसभरातील कामाच्या तणावातून मुक्ती मिळवून देणाऱ्या गरमागरम चहापर्यंत, पणजीकरांच्या जीवनशैलीत चहाला विशेष स्थान आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानातही चहाप्रेमींची संख्या कमी झालेली नाही.
पणजी परिसरातील बहुतांश चहा विक्रेते हे दररोज सरासरी ४५० ते ५०० कप चहाची विक्री करतात. यावरून इथे अस्सल चहाप्रेमी आहेत, हे अधोरेखित होते. पणजीमध्ये स्थानिक रहिवासी, वाहनचालक, मजूर, व्यापारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांत कामासाठी गोव्यात आलेले परराज्यीय कामगार हे या ग्राहकवर्गाचे प्रमुख घटक आहेत.
दिवसाची सुरुवात असो वा कामाच्या धावपळीतला छोटासा विरंगुळा, अनेकजण आवडीच्या चहासाठी आपल्या नियमित गाड्यावर किंवा चहाच्या हॉटेलमध्ये हजेरी लावतात. परिणामी, शहरातील चहाचे गाडे आणि विशेष चहा विक्रेते मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहेत. गेल्या काही दिवसांत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये चहाच्या किमती वाढल्या आहेत.
उत्पादन खर्चात वाढ झाल्याने अनेक व्यावसायिकांना दरवाढ करावी लागली. मात्र, काही चहा विक्रेत्यांनी ग्राहकांशी असलेले नाते जपण्यासाठी चहाच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानीत गेल्या काही वर्षांत केवळ चहा विक्रीवर आधारित अनेक बँड आणि स्टॉल्स उभे राहिले आहेत. मसाला चहा, कटिंग चहा, आल्याचा चहा, इलायची चहा, गुळाचा चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी अशा विविध प्रकारांमुळे ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. कार्यालयीन भाग, बाजारपेठा, बसस्थानके आणि प्रमुख चौकांमध्ये या चहाच्या स्टॉल्सना दिवसभर गर्दी पाहायला मिळते.
एलपीजी महागला, पण चहा दर तेच !
पणजीतील चहा विक्रेत्या साची रिवणकर म्हणाल्या, एलपीजीचे दर अनेकदा वाढतात आणि काही काळानंतर पुन्हा कमी होतात. प्रत्येक वेळी गॅस महागला म्हणून चहाचे दर वाढवले, तर नंतर दर कमी करणे कठीण होते. यासोबतच ग्राहकांचा विश्वास आणि कायमस्वरुपी ग्राहकवर्ग टिकवणे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या जागतिक युद्धामुळे एलपीजीचे दर वाढवल्यावरही आम्ही आमच्याकडील चहाचा दर वाढवला नाही. त्यामुळे शक्य तितके दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो.