पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि.२१) बारावीचा निकाल जाहीर केला. दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बारावीचा परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC 12th Result 2024) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेच्या प्रमाणात २.१२ टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल कोकणचा ९७.५१ टक्के एवढा आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबईचा ९१.९५ टक्के आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
यंदाही मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४४ टक्के एवढे आहे.
पुणे ९४.४४ टक्के
नागपूर ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के
मुंबई ९१.९५ टक्के
कोल्हापूर ९४.२४ टक्के
अमरावती ९३ टक्के
नाशिक ९४.७१ टक्के
लातूर ९२.३६ टक्के
कोकण ९७.५१ टक्के
एकूण ९३.३७ टक्के
९ विभागीय मंडळ
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेतली होती. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील १४ लाख, ३३,०७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून १ लाख १९ हजार ६३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामध्ये ६३ हजार ९८१ मुले, तर ५५ हजार ६५२ मुलींचा समावेश आहे. तीन जिल्ह्यांत १७८ परीक्षा केंद्रे होती.
विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहवा. निकाल पाहिल्यानंतर निकालाची प्रिंटही घेता येते. त्याचप्रमाणे डिजीलॉकर अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली.
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी बुधवार २२ मे २०२४ ते ०५ जून२०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्क भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :