

IIT Failure Success Story: शिक्षण पूर्ण झालं की आता एक चांगली नोकरी मिळेल आणि आयुष्य सेट होईल असा बहुतेक तरुणांचा विचार असतो. पण वास्तव तसं नसतं. नोकरी मिळाल्यानंतरसुद्धा समाधान राहत नाही, काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते. हर्षिल तोमर नावाच्या तरुणानेही असंच स्वप्न पाहिलं, पण त्याचा प्रवास सोपा नव्हता. IIT मध्ये दोनदा अपयश, कमी पगाराची नोकरी, आणि त्यानंतर स्वतःचा व्यवसाय, अशी त्याची प्रेरणादायी कहाणी आहे.
हर्षिल तोमर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आपला संघर्ष मांडला आहे. ते म्हणतात, “जेव्हा मी 17 वर्षांचा होतो, तेव्हा माझं एकच ध्येय होतं — IIT.” पण पहिल्याच प्रयत्नात त्यांची रँक होती 1.3 लाख आणि दुसऱ्या प्रयत्नात 75 हजार. दोन्ही वेळा अपयश आलं. तरी त्यांनी हार मानली नाही आणि एका टियर-2 कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून फक्त 33 हजार रुपयांची नोकरी मिळाली. त्या दिवसांची आठवण करताना ते म्हणतात, “दररोज बसने ऑफिसला जाताना खिडकीतून बाहेर पाहून विचारायचो, हेच माझं आयुष्य आहे का?” पण निराश होण्याऐवजी त्यांनी स्वतःला बदलायचं ठरवलं.
ऑफिसमध्ये इतर लोक वेळ वाया घालवत असताना हर्षिल React आणि Next.js शिकत बसायचे. सहा महिन्यात त्यांनी शंभराहून अधिक नोकरीसाठी अर्ज केले. सुरुवातीला कुठूनच प्रतिसाद आला नाही, पण अखेर 2024 मध्ये त्यांना पहिला जॉब मिळाला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा प्रवास बदलला.
यानंतर त्यांनी ‘हायफाईव्ह’ कंपनीत इंटर्नशिप केली आणि तिथेच नोकरी लागली. पण काही महिन्यांनी त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. हा धक्का बसल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ठरवलं की आता स्वतःच काहीतरी करायचं.
आज हर्षिल तोमर ‘ड्रीमलॉन्च’ नावाची स्वतःची कंपनी चालवत आहेत. मोठ्या कंपन्यांशी करार करून ते वर्षाला तब्बल 53 लाख रुपयांची कमाई करतात. ते म्हणतात, “माझ्याकडे ना संपर्क होते, ना कुणी मदत केली. फक्त मेहनत आणि सातत्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो.”
त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यांच्या जिद्दीचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. काहींनी लिहिलं, “अपयश कितीही मोठं असलं तरी प्रयत्न सोडू नयेत, हीच खरी शिकवण हर्षिलच्या कहाणीमधून मिळते.”