

बाळासाहेब पाटील, पुढारी ऑनलाईन : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी NoOxygenDeath एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असे ठामपणे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगून आपली पाठ थोपटून घेतली. मग ऑक्सिजन अभावी NoOxygenDeath नाही तर मग नेमके कशाने मेले तेही सरकारने सांगावे.
केंद्र सरकारने केलेल्या दावा एकालाही खोडून काढता आला नाही कारण एकाही राज्याने तशा प्रकारे मृत्यू झाल्याची नोंद पाठवली नसल्याने केंद्र सरकारने पाठविले.
आता भाजप, मोदी यांचे समर्थक भक्त मंडळी, दिशाभूल करून कधीच खरे न बोलणारे सांबित पात्रांसारखे देशभरात भाजपचे पसरलेले आक्रमक प्रवक्त्यांना जोर आला आहे.
अधिक वाचा:
काल दुपारी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तेही म्हणाले की, अशी कुठलीही नोंद नाही. याचे अनेक अर्थ लागतात.
एक तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते शरीरात ऑक्सिजन कमी पडला की त्यामुळे थेट मृत्यू होत नाही.
तर टप्प्या टप्प्याने शरीरातील एकेक अवयव बंद पडत जातात. हार्ट ॲटॅक, अस्थमा ॲटॅक, ब्रेन डेड असे काहीही होऊ शकते.
ते मृत्यूचे कारण म्हणून ग्राह्य धरले जाते. ऑक्सिजन हे कारण कुठेही नोंद नसल्याची टेक्निकली पळवाटेने सरकार जात आहे.
राज्यकर्ते कितीही दगडाच्या काळजाचे असले तरी त्यांना मृत्यू नावाची गोष्ट विचलीत करत नाही ही बाब देशभरातील सर्वच माणसांना हातून हलवून टाकणारी आहे.
माणसं तडफडून मरतात, त्यांना आपण साधी आरोग्य सुविधा देऊ शकलो नाही, आपल्याला एवढा महाकाय आणि विविधतेने नटलेला देश चालवण्याचा वकूब नाही हे मान्य करायचे लांबच.
अधिक वाचा:
माणसं मेली ती आपल्या कर्मानं असंच जणू त्यांना सांगायचे आहे. काल सायंकाळी अपवाद वगळता सर्व हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलवर राज कुंद्रा याच्या बातम्या चालत होत्या.
एनडीटीव्ही, आजतक आणि एखाददुसरी अपवाद वगळता सर्व चॅनेल असले विकृत चाळे करत होते.
दोन दिवसांपूर्वी राज्यसभेत आरजेडी खासदार प्रो. मनोज झा म्हणाले की, हे कुणा एकाचे फेल्युअर नाही तर आजपर्यंतचे कलेक्टिव्ह फेल्युअर आहे.
देशातला एकही माणूस असा नाही की त्याने आपल्या जवळचा माणूस या काळात गमावला नसेल.
'मोदी मोदी' म्हणून घसा कोरडा करणारा, शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून सरकारची बाजू सतत मांडणारा रोहित सरदाना कोरोनामुळे गेला. रुबिया लियाकत सारखी न्यूज अँकर मोदी सरकारच्या प्रेमाने वेडी झाली होती.
त्यांची ट्विट आणि फेसबुक पोस्ट काढून पाहिल्या तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी किती माणसं तडफडत होती हे आपल्या सहज लक्षात येईल.
एकवेळ आपण रविश कुमारसारख्या नेहमी सरकारची चिकित्सा करणाऱ्या पत्रकाराची ट्विट एकांगी म्हणू.
पण सरकारची तळी उचलून धरणारे पत्रकार त्या काळात आपण किती सामान्य आहोत याची जाणीव होऊन तुटून पडत होते ते तरी आता माध्यमांत काम करणाऱ्या न्यूज अँकर आणि होस्टनी लक्षात घेतले पाहिजे.
अधिक वाचा :
सांबित पात्रा हा माणूस मुळात खोटारडा आहे आणि खोटेपणाचे बक्षीस म्हणून तो राष्ट्रीय प्रवक्ता आहे.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत ऑक्सिजनबाबत निवेदन केल्यानंतर पात्रांसारख्या प्रवक्त्यांना भलतेच बळ आले.
त्यांनी सगळ्या न्यूज चॅनेलवर काँग्रेस, राहुल गांधी आणि त्या त्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना धुवून काढायला सुरुवात केली.
काँग्रेससारखा पक्ष व्हाइसलेस होण्याची अनेक कारणे आहेत. एक तर भाजपने सगळा मीडिया व्यापून टाकला आहे.
सत्ता हाच त्यांचा सोपान आहे. त्यासाठी आज एखादे स्टेटमेंट करून उद्या अगदी त्याच्या उलट बोलायला लागले तरी त्यांचे नेते मेचत नाहीत.
काँग्रेसचे नेते बोलत असतात पण त्यांच्यात एकवाक्यता नाही. जे नेते बोलत आहेत त्यांच्यात सातत्य नाही.
अनेक नेते पक्षातून जात नाहीत त्यामुळे मागील इतिहासाप्रमाणे नवी संजीवनी मिळण्याची शक्यता धूसर आहे.
त्यामुळे उपशाखा असलेल्या त्यांच्या संघटना मृतवत आहेत.
भाजप आमचा शत्रू आहे असे ते सांगतात पण बोलताना मात्र शेपूट घालतात.
आपला नेताच बोलत नाही तर आपण कशाला अंगावर घ्या, असा त्यांचा बिनतोड सवाल असतो. राहुल गांधी यांच्या बोलण्यात सातत्य नाही.
विषय घेऊन मांडणी होत नाही. त्यामुळे ऑक्सिजनअभावी माणसं मेली, ती मातीत मिसळून गेली.
त्यांचा हिशेब केला जाईल अशी शक्यता होती, ती गेल्या दोन दिवसांतील वातावरण पाहता हवेत विरून गेलीय.
अधिक वाचा
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही बेफिकीरी
कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आपल्या पत्नीसोबत लुडो खेळत होते.
इतकेच केले नाही तर तसा फोटो त्यांनी ट्विट केला. नवरात्रीची पुजा करत होते. लॉकडाऊन लागल्यानंतर प्रकाश जावडेकर सारखा नेता रामायण पहा असे सांगत होते.
दुसऱ्या लाटेत या दोन्ही नेत्यांचा नेते असलेले पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये दिदी ओ दिदी अशा हाका मारत सभा घेत होते.
हरिद्वारमध्ये कुंभमेळा व्हावा यासाठी उत्तराखंडचा तीन महिन्यांचा मुख्यमंत्री केला.
आधीच्या मुख्यमंत्र्याने कोरोनाची भीती व्यक्त केली होती पण तो ऐकत नाही म्हटल्यावर त्यालाच हाकलून लावत केवळ तीन महिन्यांचा मुख्यमंत्री केला.
त्याची कारणे अनेक दिली असतील पण माणसांच्या जीवाचे मोलच ठेवायचे नाही असे जर सरकारचे धोरण असेल तर ऑक्सिजनने आपल्या आसपासची मेलेली माणसे त्यांच्या लेखी केवळ आकडा आहे.
दुर्दैव असे की हा आकडाही सरकारच्या कुठल्याही दफ्तरात नोंद नाही.
एकीकडे संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे राजकीयीकरण करू नका असे सांगत गळा काढत आहेत.
दुसरीकडे देशभरात हॉस्पिटल आणि रस्त्या रस्त्यांवर ऑक्सिजनअभावी तडफडून मेलेल्यांकडे बघूच नका असा ते संदेश देत असतील तर ते सत्यापासून लांब पळत आहेत.
अधिक वाचा
देशभरात सर्वच राज्यांत भाजपची सत्ता नाही, पण जेथे भाजप सोडून अन्य पक्षांच्या सत्ता आहेत. दिल्लीत ऑक्सिजन तुटवड्याची चौकशी करण्यासाठी आप सरकारने समिती नेमली.
मात्र, त्याला केंद्र सरकारचे प्रतिनिधी असलेल्या नायब राज्यपालांनी परवानगी नाकारली. हे प्रातिनिधीक उदाहरण पाहता आपल्याला हवी ती आकडेवारी आपल्याला हव्या त्या साच्यात बसवून घ्यायची.
मृत्यू झाला आहे हे खरे पण तो ऑक्सिजनमुळे झालेला नाही इतके झाले खरे.
नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार कान बंद करून बसले आहे. तुम्हाला किती टाचा घासायच्या त्या घासा. आम्ही आमच्या पद्धतीने कामे करतो, असाच काहीसा कारभार आहे.
हा कारभार आत्तापर्यंत नोकऱ्या काढून घेत होता, लोकांना गरीबीत ढकलत होता, आता थेट जीवावर उठत आहे.
हेही वाचलेत का: