बेळगाव : महाराष्ट्रातील नेत्यांना सीमेवरून परत पाठवले; कर्नाटक प्रशासनाचा निषेध | पुढारी

बेळगाव : महाराष्ट्रातील नेत्यांना सीमेवरून परत पाठवले; कर्नाटक प्रशासनाचा निषेध

कोगनोळी (बेळगाव) : पुढारी वृत्तसेवा : सोमवारपासून बेळगाव येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला उपस्थिती लावण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते जात असताना दूधगंगा नदीवर त्यांना रोखून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाठवून देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेत काही वेळानंतर त्यांची सुटका केली. दूधगंगा नदीवर तब्बल दीड तास चक्काजाम झाला होता. संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला. महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी कर्नाटक प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा देत निषेध नोंदवला.

सोमवारी सकाळी महाराष्ट्रातील माजी मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या उर्फ प्रताप माने, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी व महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी दूधगंगा नदीकडे येत होते.  कर्नाटक पोलिसांतर्फे एक जिल्हा पोलिस प्रमुख, तीन डीएसपी, पाच सीपीआय, 10 पीएसआय, आठ कर्नाटका स्टेट रिझर्व पोलिस वाहने आणि पोलिस, होमगार्ड तैनात केले आहेत. त्यामुळे संपूर्ण नदी परिसराला कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांमुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अन्य आघाडीतील नेतेमंडळी, कार्यकर्ते हातामध्ये पक्षाचे ध्वज घेऊन दूधगंगा नदीवर हजर झाले होते. यावेळी बिदर, भालकी, निपाणी, बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट झालेच पाहिजे, मराठी बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही. पोलिसांच्या हुकूमशाहीचा व कर्नाटक प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केल्याने वातावरण थोडावेळ तणावपूर्ण बनले होते. महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी कर्नाटक शासनाच्या या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी नेतेमंडळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

वाहतुकीची कोंडी

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गावरून सोडले जात होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. सुमारे 2 कि. मी. अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक विद्यार्थी, शेतकरी, ट्रॅक्टर चालक, ऊस वाहतूकदार, दुचाकीस्वार यांच्यासह वाहनधारकांची गैरसोय झाली.

हेही वाचा : 

Back to top button