पुढारी वृत्तसेवा
अलीकडे राजस्थानकडे पाहिलं तर एक वेगळीच छटा दिसतेय. वाळवंटावर जणू गुलाबी रंग पसरल्यासारखं वाटतंय. कारण एकच — फ्लेमिंगो पक्षी पुन्हा भारतात यायला लागले आहेत.
हे फ्लेमिंगो आपल्याकडचे नाहीत. ते सायबेरिया, युरोप आणि मध्य आशियातून जवळपास पाच हजार किलोमीटर उडत इथे पोहोचतात. थंडी वाढली की ते उबदार प्रदेशाकडे वळतात.
राजस्थानमधील सांभर लेक ही देशातील सगळ्यात मोठा खारट पाण्याचा तलाव आहे. इथलं उथळ पाणी आणि नैसर्गिक वातावरण फ्लेमिंगोंसाठी चांगलं आहे.
2019 मध्ये मात्र सगळं अचानक बिघडलं. हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी मृत पडले. नंतर कळलं की हा एक गंभीर आजार होता एव्हियन बोट्युलिझम.Rajasthan Flamingos
तलावामधून गरजेपेक्षा जास्त मीठ काढलं गेलं. भूजलाचाही मोठ्या प्रमाणावर उपसा झाला. पाणी कमी झालं, कचरा साचला आणि त्यातून आजार पसरायला सुरुवात झाली.
ही गंभीर बाब नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलपर्यंत पोहोचली. यानंतर तलाव वाचवण्यासाठी कडक नियम लागू करण्यात आले. प्रशासनालाही जाग आली.
या वर्षी राजस्थान सरकारने सांभर लेकला राष्ट्रीय वेटलँड घोषित केलं. उत्खननावर नियंत्रण आलं आणि तलाव पुन्हा श्वास घ्यायला लागला.
त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. फ्लेमिंगो पुन्हा येऊ लागले आहेत. राजस्थान हळूहळू पुन्हा गुलाबी होत आहे.