पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा केंद्राने केला. या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. केंद्र सरकार धडधडीत खोटं बोलत आहे, अस राऊत यांनी म्हटलं. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.
'ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाले नाहीत असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांच म्हणणं आहे. मग, महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात मा.उच्च न्यायालयात एकही मृत्यू ऑक्सिजन अभावी राज्यात झाला नाही अस प्रतिज्ञापत्र दिलं आहे. मग, राज्य सरकारवर ही राऊतजी खटला भरणार आहेत का?' असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना ट्विट करुन केला.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही, अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या निवेदनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. 'बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे' असा टोलाही त्यांनी लगावला.
'ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलिंडर्स घेऊन नातेवाईकांचा जीव वाचविण्यासाठी धावत होते, हे चित्र सर्वांनी पाहिले आहे. त्यावर तरी त्यांचा विश्वास बसतो का हे सांगायला हवे.
ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,' असेही संजय राऊत म्हणाले.
'उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे,' असेही ते म्हणाले.
दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का? या काँग्रेसचे नेते के. सी. वेणूगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले.
'आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात. त्यानुसार देशभरात कुठल्याही राज्यात ऑक्सिजनअभावी मृत्यूची नोंद झाली नाही.'