चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण या दिवशी आपली वर्षभरसोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते. तो क्षण आणि दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे आपण वैद्यानिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी विदर्भातील सर्व शहर, ग्रामीण भागात निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन स्काय वाच गृप तर्फे करण्यात येत आहे.
सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो, म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. तसेच सूर्य दररोज ०.५० ° सरकतो म्हणजे, तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदिरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे ३ मे रोजी तर धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा भारतातील शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्ह्यात २१.९८° अक्षांश या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. एका अक्षांशावर येणाऱ्या सर्व परिसरात त्याच दिवशीं हा दिवस येतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.
समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. निरीक्षणाकरीता दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू, मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी. सूर्य अगदी डोक्यावर आला की, सावली दिसत नाही, अशाप्रकारे निरीक्षण करावे.
(वेळा-पूर्वेकडून १२.०५ ते पश्चिमेकडील रेखावृत्तावर १२.३० वाजता एकाच ठिकाणी २ दिवस हा अनुभव घेता येईल)
१७ मे :- अहेरी, आल्लापल्ली
१८ मे :- मूलचेरा
१९ मे :- गोंडपिंपरी, बल्लारशाह,
२० मे :- चंद्रपुर (१२.०९), वाशिम (१२.१८), मुकुटबन, पांढरकवडा, झरी, वणी, दिग्रस, लोणार
२१ मे :- गडचिरोली (१२.०६), सिंदेवाही, वरोरा, घाटंजी, मेहकर
२२ मे :- यवतमाळ (१२.१४), बुलढाणा (१२.२२), आरमोरी, चिमूर
२३ मे :- अकोला (१२.१८) हिंगणघाट, ब्रम्हपुरी, नागभीड, कुरखेडा, देसाईगंज, रामटेक
२४ मे :- वर्धा ( १२.१२), शेगाव, पुलगाव
२५ मे :- अमरावती (१२.१०), दर्यापूर
२६ मे :- नागपूर (१२.१०), आकोट, भंडारा (१२.०८),
२७ मे :- तुमसर, परतवाडा, रामटेक
२८ मे :- गोंदिया (१२.०६)
हेही वाचलंत का?
चंद्रपुर येथे शून्य सावली निरीक्षण शिबिर
स्काय वॉच गृप तर्फे चंद्रपुर येथे १९ तारखेला दुपारी १२ वाजता स्थानिक जनता महाविद्यालयात भूगोल विभागाच्या सहकार्याने भूगोल विषयाच्या विध्यार्थ्यांसाठी, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी शून्य सावली दिवस निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व खगोल, भूगोल आणि विज्ञान प्रेमी लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्काय वॉच ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.
:- प्रा सुरेश चोपणे, अध्यक्ष (स्काय वॉच ग्रुप, चंद्रपुर)