पावसाळ्यात मजबूत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार. Pudhari File Photo
विश्वसंचार

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी...

आहारात आणि दिनचर्येत आवश्यक बदल करणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ तसे पावसाळ्याबरोबरच अनेक प्रकारचे आजारही येत असतात. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मंदावत असते. सूर्यप्रकाश कमी असल्याने व एकंदरीतच ओलसर वातावरणामुळे संसर्गजन्य रोगांचा जोर वाढलेला असतो. त्यामुळेच पावसाळ्यात जर मजबूत प्रतिकारक शक्ती हवी, तर जेवणाच्या ताटात काही गोष्टी आवश्यक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात आणि दिनचर्येत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. त्याची ही माहिती...

पोषक मसाले : हळद, लवंग, काळी मिरी, दालचिनी इत्यादी भारतीय मसाले हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मसाले आहेत. हे तुमचे शरीर शुद्ध करतात आणि तुमच्या शरीराची संरक्षण यंत्रणा वाढवतात. हळदीमध्ये आढळणार्‍या कर्क्युमिनचा शरीरावर अँटिइंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट प्रभाव असतो. कर्क्युमिनला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे मानले जाते आणि ते अँटिव्हायरल म्हणूनदेखील कार्य करते.

दुग्धजन्य पदार्थ : आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दही, दूध, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात, ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढते. दही हे प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्रोत मानला जातो, जे आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना योग्य पचन राखण्यासाठी प्रोत्साहन देतात. सर्व लोकांनी याचे नियमित सेवन करावे.

आंबट फळे : जवळजवळ सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असते. संत्रे, लिंबू, अननस यांसारख्या फळांचे सेवन शरीराला हे आवश्यक जीवनसत्त्व सहज पुरवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. व्हिटॅमीन सी हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वात आवश्यक आणि फायदेशीर मानले जाते. हे पांढर्‍या रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यास उपयुक्त आहे, जे तुम्हाला संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या : पालक आणि ब्राेकोलीसारख्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमीन ए, सी, ई), खनिजे आणि फायबर भरपूर असतात. हे पोषक घटक आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतात. शरीराला आवश्यक असलेली बहुतांश पोषकतत्त्वे हिरव्या भाज्या खाल्ल्याने सहज मिळू शकतात. संशोधनात असे आढळून आले आहे की, जे लोक जास्त हिरव्या भाज्या खातात त्यांना आजारी पडण्याचा धोका कमी असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT