पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनपूर आणि नजांग दरम्यान चीन सीमेला जोडणाऱ्या तवाघाट-लिपुलेख (Uttarakhand) राष्ट्रीय मार्गावर शुक्रवारी दुपारी दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून चीन सीमेजवळील गावांचा जगापासून संपर्क तुटला आहे. नजंग तांबा गावातून जाणारा आदि कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग बंद झाल्याने स्थानिकांसह ४० प्रवासी अडकले आहेत.
नुकतीच मालघाटात दरड कोसळल्याने चीन सीमेला जोडणारा हा रस्ता बंद करण्यात आला होता. तब्बल 12 दिवसांनंतर बुधवारी (दि.२१) सायंकाळी उशिरा या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली होती. दोन दिवसांनंतर शुक्रवारी (दि.२३) दुपारी चार वाजता लखनपूर ते नजंग दरम्यानच्या टेम्पा मंदिराजवळील टेकडीला अचानक तडा गेला. दरड कोसळल्याने संपूर्ण परिसर धुळीच्या ढगांनी भरून गेला आणि रस्ता पुन्हा बंद झाला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी धाव घेत त्यांचे प्राण वाचवले. रस्ता बंद झाल्याने बियास खोऱ्यातील सात गावांचा संपर्क तुटला आहे.
खासगी टूर माध्यमातून आदि कैलास यात्रेला गेलेले ४० हून अधिक प्रवासी महामार्गावर अडकल्याची शक्यता आहे. हा रस्ता पुन्हा बंद झाल्यानंतर सीमेवरील नागरिकांना तसेच सीमेवर तैनात सैनिक व पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. रस्ता लवकर खुला होण्याची शक्यता कमी आहे. बीआरओ शनिवारपासून खडक हटवण्याचे काम सुरू करणार आहे.
हवामान खात्याने बागेश्वर, पिथौरागढ, नैनितालमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असली तरी काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूनच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असेल. दुपारनंतर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?