काष्टी : पुढारी वृत्तसेवा
श्रीगोंदा तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम सन 2020-21 ची एकूण अंतिम एफआरपी 2661.20 रूपयांपैकी रुपये 2444.40 रूपये शेतकर्यांना ऑक्टोबर 2021 पर्यंत दिलेली होती. नागवडे कारखान्याने बाकी राहिलेले रुपये 217 रुपये शेतकर्यांना दिलेले नाहीत.
यातील एकूण थकीत 25 कोटी 37 लाख 46 हजार रकमेपैकी पैकी 63 लाख 79 हजार रूपये शेतकर्यांना देण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिले आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारामध्ये मंत्रालयातील सहकार विभाग, साखर आयुक्तालय पुणे,प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्याकडे वारंवार अर्ज केले.
पवार यांनी दि.20 एप्रिल 2022 रोजी साखर आयुक्त यांना समक्ष भेटून आणि अर्ज करून नागवडे कारखान्याचे बाकी राहिलेले रुपये 217 शेतकर्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केली. त्यामुळे नगर येथील प्रादेशिक सह संचालक (साखर) यांनी नागवडे कारखान्यास पत्र काढून 4 मे 2022 ला सुनावणीस उपस्थित रहाण्याची सूचना केली होती.
प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात दि.4 मे रोजी सुनावणी झाली. सुनावणीच्या दरम्यान 22 हजार शेतकर्यांच्या वतीने पवार यांनी बाजू मांडली. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी बाजू मांडली. नागवडे कारखाना गाळप हंगाम 2020-21 ला 22 मार्च 2021 ला बंद झाला होता. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 कलम 3(3 )(ए) नुसार 14 दिवसांमध्ये एफआरपी दिलेली नसल्यामुळे वार्षिक 15 टक्के व्याजासह बाकी राहिलेली एफआरपी रक्कम शेतकर्यांना देण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी सुनावणी दरम्यान केली. नगर येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून सुनावणीनंतर निकाल देण्यात आला आहे.
त्यानुसार बाकी राहिलेल्या 217 रूपयांपैकी शेतकर्यांना प्रति टन 99.08 रुपये देण्याचा आदेश प्रादेशिक कार्यालयाने नागवडे कारखान्यास दिला आहे. त्यानुसार शेतकर्यांना एकूण थकीत 25 कोटी 37 लाख 46 हजार रकमेपैकी पैकी 63 लाख 79 हजार रूपये मिळणार आहेत. दरम्यान, प्रादेशिक कार्यालयाने 63 लाख 79 हजार रूपयांवर 15 टक्के वार्षिक व्याज शेतकर्यांना द्यावे, असा निकाल देणे अपेक्षित होते. नागवडे कारखान्याकडे अजून 24 कोटी 73 लाख 67 हजार रुपये बाकी आहेत. त्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पवार म्हणाले.