पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. अद्यापही भारतीय नागरिक युक्रेनमधून अडकून पडलेले आहेत. यावरून आता विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तर तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनीही पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अद्यापही मोदी सरकारला १८ हजार लोकांना बाहेर काढता आलेले नाही. तर भारताने १९९० मध्ये आखाती युद्धादरम्यान मोठे ऑपरेशन राबवत १ लाख ७० हजार लोकांना बाहेर काढले होते, असे सिन्हा यांनी म्हटले आहे.
यशवंत सिन्हा म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांची अंदाजे संख्या केवळ १८ हजार आहे. ही संख्या यापूर्वी भारताने केलेल्या एअरलिफ्टच्या तुलनेत फार मोठी नाही. भारताने १९९० मध्ये कुवेतमधून ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान १ लाख ७० हजार लोकांना बाहेर काढले होते. त्यावेळी बाहेर काढण्याच्या मोहिमेचे नेतृत्व माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी केले होते. त्यावेळी ते तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री होते.
ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारत सरकारने आश्चर्यकारक काम केल्याचा प्रचार करणे ही एक मोठी शोकांतिका आहे. आगामी काळात एक संकट येणार असल्याची जाणीव सरकारला होती. परंतु, युक्रेनची हवाई हद्द खुली असताना भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने वेळीच कार्यवाही सुरू करायला हवी होती. पण सरकार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते.एअरस्पेस बंद झाल्यानंतरही युक्रेनमधील आमच्या दूतावासाने विद्यार्थ्यांना तातडीने बसने किंवा उपलब्ध असणाऱ्या वाहनांनी शेजारच्या देशांमध्ये सोडण्याची व्यवस्था करायला हवी होती, असे सिन्हा म्हणाले.
दरम्यान, अडकलेल्या भारतीयांना वेळीच बाहेर न काढल्याबद्दल आणि अजूनही विलंब होत असल्याबद्दल विरोधी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार प्रभावी पावले उचलण्यात आणि पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) कृती करण्यात चुकले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ