श्रेयसने स्वत: आपल्या प्रकृतीबाबतन माहिती दिली आहे. आता त्याचे चाहते तो लवकर मैदानात परतण्याची वाट पाहत आहेत. अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची उपलब्धता अद्याप अनिश्चित आहे.
Shreyas Iyer injury update
सिडनी : टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली होती. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ॲलेक्स कॅरी याचा झेल घेण्यासाठी अय्यर झेपावला. झेल पूर्ण करताना पडल्याने त्याच्या बरगड्यांना मार लागला होता. त्याला मैदान सोडावे लागले होते. आता त्याने स्वत: इंस्टाग्रामवर आपल्या प्रकृतीबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या पोटावर आघात झाला. त्याच्या प्लीहावर (Spleen) किरकोळ छेद झाला असून अंतर्गत रक्तस्राव सुरू झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिली होती. बीसीसीआयने सविस्तर निवेदन जारी करत सांगितले की, "रक्तस्राव तात्काळ ओळखला गेला आणि तो ताबडतोब थांबवण्यात आला आहे. अय्यरची प्रकृती आता स्थिर आहे. सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करून वैद्यकीय पथक येत्या आठवड्यात त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले.
इंस्टाग्रामवर श्रेयस अय्यरने चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “ सध्या माझ्यावर उपचार सुरु आहेत. दिवसेंदिवस माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मला मिळालेल्या सर्व शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला तुमच्या विचारात ठेवल्याबद्दल धन्यवाद.”
श्रेयसने स्वत: आपल्या प्रकृतीबाबतन माहिती दिली आहे. आता त्याचे चाहते तो लवकर मैदानात परतण्याची वाट पाहत आहेत. अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची उपलब्धता अद्याप अनिश्चित आहे. सामना सुरू होण्याच्या अगदी जवळ, वैद्यकीय अहवाल आणि मॅच फिटनेसच्या आधारावर भारतीय संघ व्यवस्थापन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. ॲडलेडमध्ये श्रेयसने ७७ चेंडूत ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. या सामन्यात त्याने रोहित शर्मासोबत शती भागीदारी केली होती. त्याने मालिकेत एकूण दोन सामन्यांत ७२ धावा केल्या होत्या.
बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन श्रेयस अय्यरला मैदानात उतरवण्यासाठी घाई करणार नाहीत. त्याला पूर्ण रिकव्हरीला प्राधान्य देण्यात येईल अशी अपेक्षा आहे. तो मैदानावर उतरण्यासाठी फीट नसेल तर भारताला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी मधल्या फळीसाठी विचार करावा लागणार आहे. संजू सॅमसन, रजत पाटीदार किंवा रिंकू सिंह यांसारखे खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.