

ind vs aus t20 series travis head challenges team india
कॅनबेरा : वनडे मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ आता बुधवारपासून (दि. २८) कॅनबेरा येथून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. संघाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने टीम इंडियाला खुले आव्हान दिले आहे. आमच्याकडे तळापर्यंत फलंदाजीची दमदार फळी असल्यामुळे आम्ही आक्रमक फलंदाजीची रणनीती पुढेही सुरू ठेवू आणि विजय मिळवू,’ असे त्याने म्हटले आहे.
हेडने कांगारू संघाच्या फलंदाजीच्या धोरणाचे अगदी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा आमचे नुसते 'खेळणे' हे उद्दीष्ट नसते, तर आम्ही प्रतिस्पर्धी संघाला दबावात आणून 'दहशत' निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतो. संघात पॉवर हिटिंगची प्रचंड क्षमता असेल, तर तुम्ही मैदानावर सुरुवातीपासूनच तुमचा रुबाब आणि वेग दाखवला पाहिजे.’
संघाच्या फलंदाजी फळीकडे बोट दाखवत हेडने मोठे विधान केले आहे. तो म्हणाला, ‘जेव्हा तुमच्या पाठिशी टीम डेव्हिड, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे दिग्गज फलंदाज उभे असतात, तेव्हा सुरुवातीच्या षटकांमध्ये तुम्ही जास्त चेंडू फुकट घालवणे, हे अक्षम्य आहे. आमच्याकडे जबरदस्त आणि विध्वंसक पॉवर आहे. ऑस्ट्रेलियाचा हा संघ केवळ धावसंख्या नाही, तर प्रतिस्पर्धकांवर सुरुवातीपासूनच मानसिक दबाव टाकण्यासाठी उत्सुक आहे.’
‘मागील टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या रणनितीमध्ये मोठा बदल केला आहे. आता हा संघ प्रति षटक १० धावांहून अधिक गतीने धावा करत आहे. भारताविरुद्धही संघ याच आक्रमक दृष्टिकोनातून मैदानात उतरेल,’ असेही हेडने स्पष्ट केले.
हेडने आत्मविश्वासाने सांगितले, ‘जर आम्ही सुरुवातीला फॉर्ममध्ये आलो, तर आम्ही कोणताही स्कोअर उभा करू शकतो. पॉवरप्लेचा पूर्ण फायदा घेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला बेजबाबदार व्हायचे नाही, पण काहीवेळा आम्ही धोका पत्करत आहोत, असे वाटू शकते. पण, खरे तर तीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.’
ऑस्ट्रेलियाच्या संघात हेड, कर्णधार मिचेल मार्श आणि जॉश इंग्लिस हे आघाडीच्या फळीत आहेत, तर मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, मार्कस स्टॉयनिस, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू शॉर्टसारखे पॉवर हिटर्स आहेत. कॅमेरून ग्रीन या मालिकेत खेळणार नसला तरी, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खूपच मजबूत दिसत आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने २०२५ मध्ये आतापर्यंत टी-२० पॉवरप्ले (सुरुवातीची सहा षटके) मध्ये सरासरी ६१ धावा वसूल केल्या आहेत. यादरम्यान त्यांचा स्ट्राइक रेट १६९.९७ इतका राहिला आहे. हे आकडे कांगारू संघाची आक्रमक खेळी स्पष्टपणे दर्शवतात.
मागील काही वर्षांत संघ शीर्ष तीनमध्ये एका 'अँकर' फलंदाजाला स्थान देत असत, पणा आता संघांनी रणनिती बदलली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये संघांकडून वेगवान खेळासाठी प्रत्येक टप्प्यावर आक्रमक फलंदाजांना प्राधान्य दिले जात आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांसारख्या संघांनी याच रणनीतीचा वापर करून यश मिळवले होते.