Parambrata Chatterjee FIR
कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने २०२१ च्या विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. त्यावेळी अभिनेता परमब्रत चॅटर्जीने केलेली पाच वर्षे जुनी 'रोग्राणी दिवस' (Rograni Dibosh) संदर्भातील सोशल media पोस्ट आता त्याच्या अंगाशी आली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने परमब्रतला अटकपूर्व जामीन मंजूर केला असला, तरी या पोस्टमुळे तो मोठ्या अडचणीत सापडला आहे.
बंगाली आणि हिंदी चित्रपटांतील (सुजॉय घोषचा 'कहाणी') आपल्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या परमब्रतवर २०२१ च्या निवडणूक निकालानंतर केलेल्या एका ट्विटमुळे (X वरील पोस्ट) FIR दाखल झाला आहे. परमब्रत हा तृणमूल काँग्रेसचा (TMC) समर्थक म्हणून ओळखला जातो. त्याने २०२६ च्या निवडणुकांमध्ये बारसात, मध्यमग्राम, रिश्रा आणि नोआपारा येथे टीएमसी उमेदवारांचा प्रचारही केला होता.
२०२१ च्या विधानसभा निकालांनंतर राजकीय हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप परमब्रतवर आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते, "आजचा दिवस जागतिक 'रोग्राणी दिवस' (मारहाण किंवा धू-धू धुण्याचा दिवस) म्हणून घोषित केला जावा." केवळ परमब्रतच नाही, तर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिचे नावही या FIR मध्ये आहे. या पोस्टवर "हाहाहा होक होक" (हाहाहा, होऊ दे, होऊ दे) अशी कमेंट करत बिअरच्या दोन मगांचे इमोजी पोस्ट केले होते. आता या पोस्ट आणि कमेंटमुळे दोघेही कायदेशीर कचाट्यात सापडले आहेत. अधिवक्ता जॉयदीप सेन यांनी कोलकाता येथील गरियाहाट पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. परमब्रत आणि स्वस्तिका यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे २०२१ मधील मतदानानंतरच्या मोठ्या प्रमाणावरील हिंसाचाराला चिथावणी दिली, असा आरोप त्यांनी केला आहे.
परमब्रतवर स्वतःच्या राजकीय तडजोडीचे (TMC सोबत केलेली तडजोड) समर्थन करण्यासाठी आपल्या तान्हुल्या मुलाचा आडोसा घेतल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. "माफी मागण्यासाठी मुलाचा वापर करणे लज्जास्पद आहे" आणि त्याची बदलती भूमिका म्हणजे "ढोंगीपणा आणि संधीसाधूपणा" असल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे.
परमब्रतने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन आणि FIR रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने त्याला अंतरिम दिलासा देत, पोलिसांना पुढील चार आठवडे कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत, मात्र त्याला तपासात पूर्ण सहकार्य करावे लागेल. दरम्यान, अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीची गरियाहाट पोलीस ठाण्यात सुमारे तासभर चौकशी करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतरचा हिंसाचार ही एक जुनी आणि दुर्दैवी राजकीय परंपरा राहिली आहे आणि २०२१ मध्येही तेच घडले. २ मे २०२१ रोजी जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा विजय निश्चित झाला, तेव्हा राज्यात हिंसाचाराची लाट आली. या रक्तापाताच्या दरम्यानच परमब्रत चॅटर्जीने ते ट्विट केले होते. त्याने बंगालीत लिहिले होते, "आज बिश्वा रोग्राणी दिबश घोशॉना होक" (आजचा दिवस जागतिक मारहाण दिवस म्हणून घोषित केला जावा). त्याला उत्तर देताना स्वस्तिका मुखर्जीने लिहिले, "हाहा, होक होक" (हाहा, होऊ दे). स्वस्तिका मुखर्जी ही बंगालमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने 'भूतर भकिष्यत' सारख्या चित्रपटांत काम केले आहे. हिंदी प्रेक्षक तिला 'कला' (Qala) आणि 'दिल बेचारा' चित्रपटामुळे ओळखतात.
२०२१ मध्ये या पोस्टवर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, पाच वर्षांनंतर बंगालचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आला आहे. त्यानंतर २१ मे रोजी वकील जॉयदीप सेन यांनी गरियाहाट पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या पोस्टमुळे राज्यातील वातावरण बिघडले आणि बेलियाघाटा येथे भाजप कार्यकर्ता अभिजित सरकारची झालेली हत्या याच चिथावणीचा परिणाम होती, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. सध्या देशात 'भारतीय न्याय संहिता' (BNS) लागू असली, तरी ही घटना २०२१ मधील असल्याने पोलिसांनी जुन्या 'भारतीय दंड संहितेच्या' (IPC) कलम १०९ (गुन्ह्यास प्रवृत्त करणे) आणि १५३A (दोन गटांत शत्रुत्व निर्माण करणे - हा अजामीनपात्र गुन्हा आहे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी परमब्रत भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आहे. २०२६ च्या निवडणुकीपूर्वी त्याने तृणमूलचा प्रचार केला होता, मात्र भाजपच्या दणदणीत विजयानंतर परमब्रतने आपली भूमिका बदलल्याचे वृत्त आहे. 'द टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, परमब्रतने म्हटले की, आपल्या एक वर्षाच्या मुलाच्या सुरक्षेसाठी त्याला तृणमूल काँग्रेससोबत 'तडजोड' करावी लागली होती. यावर कपडे डिझायनर शुचिस्मिता दासगुप्ता यांनी टीका करत म्हटले की, "मुलाचे नाव पुढे करून माफी मागणे लज्जास्पद आहे." तर अभिनेता देवदूत घोषने त्याची तुलना 'सरड्याशी' केली. भाजप नेत्या लॉकेट चॅटर्जी म्हणाल्या की, "जे कलाकार पूर्वी भाजपला अस्पृश्य मानत होते, ते आता स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत."
भाजप सरकारने सत्तेत येताच २०२१ च्या निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर मोहीम तीव्र केली आहे. राज्य पोलीस आणि सीआयडीने (CID) ५९ जुनी प्रकरणे पुन्हा उघडली आहेत, ४५८ नवीन चौकशी सुरू केल्या आहेत आणि १८१ नवीन FIR नोंदवले आहेत. अनेक स्थानिक खंडणीखोर आणि हिंसाचारात सामील असलेल्या टीएमसी समर्थकांना अटक करून त्यांची जाहीर धिंड काढण्यात आली आहे. परमब्रत चॅटर्जी हा कोणताही गुंड किंवा बाहुबली नेता नाही, तरीही त्याच्या पाच वर्षे जुन्या पोस्टने त्याला कायदेशीर फेऱ्यात अडकवले आहे.