

भारतीय जनसंघाची स्थापना करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना भाजप आपला 'संस्थापक जनक' मानतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वारसदार असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
BJP West Bengal victory 2026
कोलकाता : भारतीय राजकारणात आजचा (दि. ४ मे) दिवस ऐतिहासिक ठरला आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित ठरलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवल्याचे चित्र आहे. यंदाची निवडणूक ही भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भारतीय जनसंघाची स्थापना करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगाल अस्मितेचे कारण ठरले
दक्षिण कोलकात्यात 'एस.पी. मुखर्जी रोड' नावाचा एक मुख्य रस्ता आहे. कोलकात्यातील बहुतांश रहिवासी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव याच रस्त्यामुळे ओळखतात. हा रस्ता शहराच्या महत्त्वाच्या भागांना जोडतो. विरोधाभास असा की, यात कालीघाट आणि भवानीपूरचाही समावेश होतो. येथेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान आणि त्यांचा मतदारसंघ आहे.
पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जोरदार लढत देण्यामागील प्रेरणा श्यामाप्रसाद मुखर्जी हेच आहेत. भाजप त्यांना आपला संस्थापक मानतो. मुखर्जी हे प्रख्यात आशुतोष मुखर्जी यांचे पुत्र होते. आशुतोष मुखर्जी यांना 'बंगालचा वाघ' म्हटले जायचे आणि राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्यावर एक स्वतंत्र धडाही आहे. एक गणितज्ञ, वकील, न्यायशास्त्रज्ञ, कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू असलेले आशुतोष मुखर्जी हे खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी शिक्षण आणि न्याय क्षेत्रात मोठी क्रांती घडवली.
आशुतोष मुखर्जी यांच्या मुलाने, म्हणजेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९२९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात पाऊल ठेवले. बंगाल विधानसभेत प्रवेश केला. १९३९ मध्ये ते बंगालमधील हिंदू महासभेचे सदस्य झाले. वर्षभरातच ते अध्यक्ष बनले. 'छोडो भारत' चळवळीचे टीकाकार असूनही, महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांनी हिंदू महासभेशी संबंध तोडत त्या घटनेचा निषेध केला. स्वतंत्र भारताच्या जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता. मात्र, १९५० मध्ये मुखर्जी यांनी सरकारचा राजीनामा दिला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. यानंतर १९५१ मध्ये त्यांनी 'भारतीय जनसंघा'ची स्थापना केली. पुढच्याच वर्षी या पक्षाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या. भाजपच्या दृष्टीने दिल्लीच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या प्रवासाची हीच खरी सुरुवात होती.
पश्चिम बंगालमधील राजकीय विश्लेषकांच्या मते, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नेहमी भाजपला बाहेरचे म्हणून हिणवत होत्या. या टीकेला छेद देण्यासाठी भाजपने मुखर्जींच्या नावाचा वापर करत 'बंगाली अस्मितेचा' नारा दिला. स्वतःची 'बंगाली मुळे' घट्ट करण्यासाठी भाजपने श्यामाप्रसाद मुखर्जींच्या वारशाचा आधार घेतला आहे. या निवडणुकीत भाजपने वारंवार मुखर्जींच्या नावाचा उल्लेख करून आपली 'बंगाली ओळख' सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे माजी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले होते की, "आज जर बंगाल भारताचा भाग असेल, तर ते केवळ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळेच. इतकेच नाही तर संयुक्त पंजाबचा एक मोठा भाग आज भारतासोबत आहे, याचे श्रेयही त्यांनी उठवलेल्या आवाजाला जाते." आज बंगालमधील भाजपचा विजय हा एका दीर्घकालीन स्वप्नाची पूर्तता आहे. हा प्रवास २०१६ मध्ये सुरू झाला होता. त्यावर्षी पक्षाने केवळ ३ जागा आणि १० टक्के मते मिळवली होती. पाच वर्षांनंतर, २०२१ मध्ये ७७ जागा आणि ३८ टक्के मतांपर्यंत मजल मारत मोठी झेप घेतली. आणि आता, २९४ सदस्यीय बंगाल विधानसभेत भाजप १४८ जागांवर आघाडीवर आहे. येथे भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.