पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांचा ७ मार्चला वाढदिवस. त्यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी शिमला येथे झाला. अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. पण, त्यांना अभिनेता बनण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये प्रचंड स्ट्रगल करावे लागले. स्ट्रगलिंग डेजमध्ये अनुपम खेर हे मुंबई रेल्वे स्टेशनवर झोपत होते. पण, असं काही घडलं की, पंख फुटल्यासारखं त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. रेल्वे स्टेशनवर झोपणाऱ्या या अभिनेत्याकडे आता कोटींची संपत्ती आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी.
रंगभूमी आणि हिंदी चित्रपटातील एक विविधरंगी कलाकार म्हणून अभिनेते अनुपम खेर यांची ओळख. चित्रपटात काम करणार्या अनुपम यांना रंगभूमीचाही प्रदीर्घ अनुभव आहे. अभिनयाचे विविध पैलू जोपासणार्या या कलाकाराला पाच वेळा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनयाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. रंगभूमी ते बॉलिवूड असा त्यांचा प्रवास कसा झाला, जाणून घेऊयात.
अनुपम खेर यांचे वडील पुष्कर नाथ हे क्लार्क होते. अनुपम यांनी शिमलाच्या डी. ए.व्ही स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तसेच दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. अनुपम यांना अभिनेता व्हायचे होते. पण, ते त्यांच्या वडिलांना ते मान्य नव्हते.
anupam kher
अनुपम खेर यांनी १९७१ मध्ये 'टायगर सिक्स्टीन' आणि १९८२ मध्ये 'आगमन' या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरूवात केली. पण, त्यांचे भाग्य उजळले ते १९८४ मध्ये आलेला चित्रपट 'सारांश'ने. बॉलिवूडमध्ये अनुपम यांची प्रतिभा हेरली ती महेश भट्ट यांनी. सारांश या चित्रपटात अनुपम यांनी २९ व्या वयात एका रिटायर्ड वृध्दाची भूमिका केली होती. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी बहुतांशी चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून काम केलं. तरीदेखील, त्यांची बॉलिवूडमध्ये एक खास अशी ओळख निर्माण झाली.
पुढे त्यांनी सुभाष घई यांच्या 'कर्मा'मध्ये काम केले. या चित्रपटात त्यांनी डॉ. डँगची भूमिका साकारली होती. तर 'डॅडी' चित्रपटातील तलत अझीझ यांच्या 'आईना मुझसे मेरी पहलीसी नजर मांगे' ही आर्त गझल पडद्यावर गातानाही ते दिसले. पुढे महेश भट्ट यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली.
विजया मेहता यांच्या 'रावसाहेब'मध्ये विक्रम गोखलेंच्या विरोधातील भूमिका साकारली. तर तारुण्यात असताना 'संसार'मध्ये एव्हरग्रीन रेखा यांच्या सासर्याची भूमिका साकारली. 'जानू' नावाच्या एका चित्रपटात त्यांच्याच वयाच्या खूशबू या अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 'अर्जुन' चित्रपटात सभ्यतेचा बुरखा पांघरणारा राजकीय गुंडाची भूमिका साकारली.
अनुपम यांनी केवळ अभिनयच नव्हे तर दिग्दर्शक आणि निर्माताही आहेत. चित्रपट 'ओम जय जगदीश' त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. तर 'मैंने गांधी को नहीं मारा' हा चित्रपट त्यांनी प्रोड्युस केला. अनुपम यांना भारत सरकारने २००४ साली 'पद्मश्री' आणि २००६ साली 'पद्मभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित केले.
एका रिपोर्टनुसार, अनुपम यांचे मुंबईत २ बंगले आहेत. एक अंधेरीत आणि दुसरा जुहूमध्ये. या बंगल्यांची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. त्यांच्याकडे बीएमडब्लू, स्कॉर्पिओ यासारख्या गाड्या आहेत. त्यांनी आतापर्यंत पाचशे चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अने शो केले आहेत.
अनुपम यांनी मधुमालती यांच्याशी लग्न केले होते. मात्र, काही कारणास्तव हे लग्न टीकू शकले नाही. यानंतर १९८५ मध्ये त्यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्याशी लग्न केले. किरण खेर यांचही हे दुसरं लग्न होते.
बॉलिवूड शिवाय अनुपम खेर यांनी अमेरिकन, ब्रिटीश आणि चायनीज चित्रपटात काम केलं आहे.