Heat wave continues due to monsoon delay
मान्सूनच्या विलंबामुळे उष्णतेची लाट सामोरे जावे लागले. Pudhari File Photo
संपादकीय

मान्सूनच्या चिंतेचा काळ

arun patil

के. जे. रमेश, माजी महासंचालक, हवामान विभाग

या वर्षी ‘वेस्टर्न डिस्टबर्न्स’चे प्रमाण कमी राहिल्याने आणि 20 दिवस पाऊस लांबल्याने सर्वांना आणखी एका अनाकलनीय उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागले. या दिवसांत तापमान सलग 40 अंशांपेक्षा अधिक राहिले. परिणामी, पर्वतीय भागातही कमाल तापमानाने विक्रम मोडला. आता किरकोळ पावसाने त्यात घट झाली आहे; परंतु वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने कमाल तापमान वाढले आहे.

देशातील बहुतांश भागातील नागरिकांनी प्रचंड उष्णता सहन केल्यानंतर मान्सून धडकल्याने समाधान व्यक्त केले. विशेषत: बराच काळ 40 अंशांपेक्षा अधिक तापमान सहन करणारे उत्तर भारतातील नागरिकही सुखावले आहेत. या वर्षी केरळमध्ये मान्सून ठरल्याप्रमाणे अपेक्षेनुसार 30 आणि 31 मे रोजी दाखल झाला; मात्र पूर्वेकडे जाताना वाटेत थांबला. आता 20 जूननंतर पुन्हा सक्रिय झाला आहे. थांबलेल्या पावसाने निर्माण झालेला उकाडा लवकरच कमी होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. प्रत्यक्षात मान्सून केरळच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर दोन मार्गांनी वाटचाल करतो. एकीकडे बंगालचा उपसागर आणि दुसरा मार्ग अरबी समुद्र. या वर्षी पाऊस पूर्व भागात थांबला; परंतु पश्चिम भागात म्हणजे अरबी समुद्रात वेग चांगला होता आणि 10 जून रोजी महाराष्ट्रात पोहोचला. अर्थात, मान्सूनचा वेग अचानक मंदावला आहे, असे समजणे चुकीचे आहे. ती एक हवामानातील सामन्य बाब मानली जाते; पण 20 दिवसांपर्यंत थांबणे अर्थातच चिंताजनक होते. शेवटी असे का घडले? यामागचे प्रमुख कारण म्हणजे हवामान बदल. शिवाय बदलत्या हवामान स्थितीमुळे वायव्येकडून पूर्वेकडे वाहणारे वारे बंगालच्या खाडीतून निर्माण होणार्‍या पावसाळी वातावरणावर भारी ठरले.

आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर दिल्ली आणि उत्तर भारतातील बहुतांश भाग हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाणी-पाणी होतो. तोपर्यंत या ठिकाणी उकाडा राहतो; पण अधूनमधून पाऊस पडतो आणि काही प्रमाणात उष्म्यापासून दिलासा मिळतो; पण या वर्षी ‘वेस्टर्न डिस्टबर्न्स’चे प्रमाण कमी राहिल्याने आणि 20 दिवस पाऊस लांबल्याने सर्वांना आणखी एका अनाकलनीय उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागले. या दिवसांत तापमान सलग 40 अंशांपेक्षा अधिक राहिले. मान्सून पूर्णपणे उत्तर भारतात सक्रिय होईल, तेव्हाच उष्णता कमी होईल.

यंदा पावसावरून आणखी एक चिंता व्यक्त होत आहे आणि ती म्हणजे मान्सून दाखल होताच पडणारा मुसळधार पाऊस. सिक्कीम, आसामसह संपूर्ण ईशान्य भारत पुराने वेढला गेला आहे. याचप्रमाणे पश्चिम किनारपट्टी, तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेशसारख्या भागातही सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडला. उत्तर भारतातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. या ठिकाणी पावसासाठी आतूर झालेल्या शेतीला पुरेसे पाणी मिळेल. ग्रामीण भागाचे सोडा, पण शहराचे काय? शहरातील पूर व्यवस्थापन आघाडीवर अद्याप पुरेशी तयारी नसल्याने नागरिकांसमोर अडचणी वाढू शकतात. आतापर्यंतचा अनुभव पाहिला तर पाच-दहा सेंटिमीटर पाऊस पडताच शहरे जलमय होतात. यामागचे कारण केवळ नाल्यांची योग्यरीतीने साफसफाई न करणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसून, बहुतांश भागात पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत. म्हणून थोडा जरी पाऊस पडला तरी शहरात अडचणी वाढताना दिसतात. अशावेळी सोसायट्यांनी पालिकांवर दबाव आणणे गरजेचे आहे; अन्यथा हे चित्र बदलणे कठीण राहू शकते. ही स्थिती लहान शहरांतील नाही, तर महानगरांची आहे. हवामान खात्याने नेहमीच पावसाच्या बदलत्या स्थितीबाबत सजगता दाखवली. पावसाचा अंदाज हा रंगांच्या माध्यमातून दाखवतात. त्यात नारंगी (केशरी) रंग हा पाऊस सुरू होण्याचे सांगतो, तर लाल रंग हा मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत देतो. दरवर्षी याच पद्धतीनुसार पावसाची स्थिती दर्शवली जात असताना प्रशासकीय तयारी फारशी नसल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. किनारपट्टीवर धडकणार्‍या चक्रीवादळासंदर्भात ज्याप्रमाणे निर्देशाचे पालन केले जाते, तसेच शहरांतही आपत्कालीन व्यवस्था अमलात आणून पाऊस आणि पूरस्थितीशी सामना करण्यासाठी सज्जता राखणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT