गंगाखेड : तालुक्यातील मुळीसह गोदाकाठ परिसरातील १० गावात रविवारी (दि.३०) दुपारी ३ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान सलग ३ तास अतिवृष्टी झाली. यामध्ये गोदावरीसह इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून उभ्या शेतात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे.
मागील सात ते आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांत दुबार पेरणीचे सुलतानी संकट येते की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु रविवारी सकाळपासूनच तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामध्ये दुपारी ३ ते ६ या वेळेत तालुक्यातील मुळी गावासह परिसरातील गावात अक्षरशः अतिवृष्टी झाली. यामध्ये मुळी, धारखेड परिसरासह नागठाणा, भांबरवाडी, चिंचटाकळी, गौंडगाव, धारासुर, रूमणा, जवळा, सायळा, सुनेगाव, खळी, धसाडी, आंगलगाव आदी गोदाकाठच्या परिसरातील गावांचा समावेश आहे.